बहुजननामा ऑनलाइन टीम – वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ -३ मधील तुळिंज पोलीस ठाण्यातील मयत पोलीस नाईक सखाराम भोये यांनी २४ डिसेंबर २०२० रोजी तुलिंज पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक यांच्या दालनातच सकाळच्या वेळी पिस्तुलाने स्वतः च्या डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली होती. मयत पोलीस नाईक सखाराम भोये(Sakharam Bhoye) यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणी आठ दिवस उलटून गेले. अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही. सध्या पोलीस वर्तुळात हत्या की आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. मयत पोलीस नाईक सखाराम भोये हत्या की आत्महत्या याचा उलगडा होण्यासाठी हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याच्या मागणीचे निवेदन आदिवासी विकास परिषदेचे राज्य युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सहीत विधानसभा उपाध्यक्ष व गृहमंत्री अनिल देशमुख तसंच इतर संबंधित मंत्र्यांना दिल्याची माहिती लकीभाऊ जाधव यांनी दिली आहे.
या प्रकरणी तातडीने या घटनेची गंभीर नोंद घेत जिल्ह्यातील आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी या घटनेस तेथील पोलीस निरीक्षक जयप्रकाश सूर्यवंशी जबाबदार आहे आणि त्यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांच्यावर सदोष मनुष्य वध, जातिवाचक आदी गंभीर गुन्हे दाखल करण्यासंबंधीचे निवेदन गृहमंत्री व वसई विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना भेटी वेळीं देण्यात आले होते. सदर प्रकरणाची पोलीस आयुक्त डॉ. सदानंद दाते यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणी परिमंडळ ३ चे उपायुक्त प्रशांत वाघूडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करून चौकशीत जे सत्य समोर आढळून आल्यावर नक्कीच कायदेशीर कारवाईला सामोर जावं लागेल.
तसंच, भोये यांच्या कुटुंबाला शक्य होईल ती शासकीय मदत किंबहुना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दस्तुरखुद्द स्वतः वसई विरार पोलीस आयुक्तांनी त्यावेळेस आदिवासी विकास व विविध आदिवासी संघटनांच्या शिष्टमंडळाला दिलं होतं. तुळिंज पोलीस स्टेशन येथे मयत पोलीस नाईक सखाराम भोये यांनी पोलीस निरीक्षक जयप्रकाश सूर्यवंशी यांच्या जाचाला वैतागून आत्महत्या केली असा आदिवासी संघटना व भोये कुटुंबीयांचा आरोप व वजा संशय आहे. त्यातून या प्रकरणी आठ दिवस उलटले तरी पोलीस निरीक्षकावर अद्यप कारवाई वजा या घटनेतील नेमकं सत्य समोर येत नाही त्यामुळेच पोलीस वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. किंबहुना याचा उलगडा सीआयडी तपासात अधिक पारदर्शक होण्याची शक्यता अधिक असल्याने आदिवासी संघटनानी मुख्यमंत्री ठाकरे सहीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ तसेच गृहमंत्री अनिल देशमुख आदीकडे सीआयडी तपासाची मागणी केली आहे.
दरम्यान, दि. ३० डिसेंबर ला अचानकपणे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांना मि भा व वि आयुक्तांलयाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे आणि तसे आदेश पोलीस आयुक्तांलय यांनी काढले आहेत. मयत सखाराम भोये आत्महत्या या गंभीर प्रकरणाची परिमंडळ ३ चे उपायुक्त प्रशांत वाघूडे यांच्यामार्फत चौकशी सुरू आहे.