नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे चांद्रयान 2 च्या यशात मुथाया वनिता आणि रितु करिढाल यांचं विशेष योगदान आहे. इतरही विविध क्षेत्रात महिलांनी आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवले आहे. हिमा दास असो किंवा मग किरण बेदी, महिला कोणत्याच क्षेत्रात कमी नाहीत. अनेक मुली आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहराचा रस्ता धरतात. दुसरीकडे गावातील काही भागातील वर्गांमध्ये आजही रुढीवादी विचार कायम असल्याचे दिसत आहे. विचार जे जखडून ठेवतात. असे विचार देशाच्या विकासात बाधा आहेत.
एकीकडे मुली शिक्षणासाठी विदेशात जातात तर दुसरीकडे गावात मुलींना मूळ शिक्षणापासूनही वंचित ठेवलं जातं आणि कमी वयातच त्यांचं लग्न केलं जातं. अशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना सतना जिल्ह्यातील टगरपार गावातील आहे. या गावातील 17 वर्षांच्या मुलीने मेहंदीच्या कार्यक्रमात लग्न न करण्याची घोषणा केली. मुलीसाठी असं करणं म्हणजे खूप धाडसाचं काम होतं. त्यांचं एका खोलीचं मातीचं घर पाहुण्यांनी भरलं होतं. असे असतानाही तिच्या आईवडिलांनी तिच्या निर्णयाचे समर्थन केले आणि तिचे शिक्षण पूर्ण करण्याची हमी दिली.
सोनाने अगोदर लग्नासाठी होकार दिला होता. कारण बालविवाहाच्या दुष्परिणामांची तिला माहिती नव्हती. तिच्या आजीचं आणि मावशीचं लग्नंही अल्पवयीन असतानाच झालं होतं. परंतु लग्नाच्या दोन दिवस आधी लग्न थांबवण्यामध्ये तिच्या मावशीने महत्त्वपूर्ण भूमिका निभवली आहे.
याबाबत बोलताना सोना म्हणाली की, “माझ्या मावशीने मला तिच्या समस्यांबद्दल सांगितले की, कशा प्रकारे तिला आपले शिक्षण सोडण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. ती 15 वर्षांपासून क्रोनिक एनिमियाने ग्रस्त आहे. कारण लग्नानंतर ती 16 वर्षांची होती तेव्हाच तिने पहिल्या मुलाला जन्म दिला. ती खूपच कठिण परिस्थितीत जगत आहे. कारण तिला आता 6 मुलं आहेत. तिचं सर्वात लहान मूलं 7 महिन्यांचं आहे. तिने मला लग्नासाठी नकार द्यायला सांगितले. नाहीतर मलाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला असता.”
सोनाची मावशी रेखा बाईने(32) खुलासा केला की, डॉक्टरांनी तिला मुलं जन्माला न घालण्यासाठी सल्ला दिला. परंतु तिच्या मजूर पतीला पुरुष नसबंदी करायला मात्र नको वाटतं. ती म्हणाली की, “कुटुंबियांना माझं लग्न करायचं होतं. परंतु त्यांचं उत्पन्न एवढं नव्हतं की, ते पोट भरू शकतील. माझ्या सासरच्यांनी मला माझं शिक्षण पूर्ण करु दिलं नाही आणि मला लवकरच आई बनवलं. मी माझ्या पुतणीला आणि मुलींना असे नाही करु देणार. जर मी माझं शिक्षण पूर्ण केलं असतं तर आज माझं आयुष्य काही वेगळं असलं असतं.”
सोनाची आई मिताबाईचं म्हणणं आहे की, ती खुश आहे की, तिच्या बहिणीने तिच्या मुलीला समजवण्याचं पाऊल उचललं. ती म्हणाली की, “मी आणि माझ्या पतीने सोनावर दबाव न टाकण्याचा निर्णय घेतला आहे.”