कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन : ‘माझ्यावर बदनामीचा दावा दाखल करण्याचा इशारा काय देता, आजच विनाविलंब दावा दाखल करा,’ असे आव्हान ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जी सीबीआयची कारवाई केली, त्यामागे भाजपचेच कटकारस्थान आहे, असा आरोप मुश्रीफ यांनी पुन्हा केला.
हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांना खुले आव्हानच दिले. ते म्हणाले, ‘न्यायालयाची यामध्ये कसली बदनामी? सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपनेच ही खेळी केली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावर बदनामीचा खटला दाखल करावाच. ज्यामुळे ‘दूध का दूध अन् पाणी का पाणी होऊन जाईल.’ मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी भाजपच्या दबावानेच ते पत्र दिल्याचा आम्हाला संशय आहे. तसेच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर स्फोटके कुणी ठेवली, त्याचे पुढे काय झाले याबाबत सातत्याने आम्ही विचारणा करत आहोत. त्याबाबत एनआयए काहीच सांगत नाही. या प्रकरणात परमबीर सिंग यांचाच हात असण्याची शक्यता आहे’.
दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने जी कारवाई केली, त्यामागे भाजपचेच कटकारस्थान आहे, असा आरोप मुश्रीफ यांनी केला होता. मुश्रीफ यांच्या या आरोपामुळे भाजपची बदनामी झाली असून, मुश्रीफ यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिला होता. त्यानंतर मुश्रीफ यांनी पलटवार केला आहे.
अनिल देशमुखांना अटक होणार नाही
केवळ राजकीय सनसनाटी निर्माण करण्यासाठी आणि सरकार अस्थिर करण्यासाठीच भाजपने अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय कारवाई केली आहे. या प्रकरणात देशमुख यांना अटक होणार नाही. केवळ एका खोट्या पत्रावर, एका आरोपीने दिलेल्या पत्रावर अशी कारवाई होणे शक्य नाही, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.