बहुजननामा ऑनलाइन टीम – निर्णय मातोश्रीवर बसून घ्या, वर्षावर बसून घ्या, मंत्रालयातून घ्या, नाहीतर राज्यात दौरा करून घ्या परंतु जनहिताचे निर्णय घ्या असा टोला माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लगावला आहे. महाविकास आघाडी स्वत:ची निष्क्रियता लवपण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवत आहे असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केला.
देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण महाराष्ट्रातील वाढता कोरोना संसर्ग पाहता या पार्श्वभूमीवर शनिवारी कोल्हापूर दौरा केला. यावेळी त्यांनी येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाला भेट दिली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
‘जिथं बसून निर्णय घ्यायचे असतील तिथं बसून घ्यावेत, परंतु निर्णय घ्यायला हवेत’
पत्रकारांसोबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुख्यमंत्री बाहेर का दिसत नाहीत यावर मी भाष्य करणार नाही. त्यांना जिथं बसून निर्णय घ्यायचे असतील तिथं बसून घ्यावेत. परंतु निर्णय घ्यायला हवेत. प्रशासकीय रचनेत दौऱ्याचं एक महत्त्व असतं. यातून कामाला गती मिळते. ते दौरे का करत नाहीत यावर मला काहीही बोलायचं नाही. टीकाही करायची नाही.”
‘दारूची दुकानं मॉल सुरू, मग मंदिरं का बंद ?’
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “दारूची दुकानं, मॉल सुरू केले आहेत. मग राज्य सरकार मंदिरं का नाही खुली करत. काही राज्यात धार्मिक स्थळं खुली करण्यात आली आहे. तिथं कोरोना संसर्ग वाढल्याचं दिसत नाही. मग त्याची भीती घालून मंदिरं उघडी ठेवणं कितपत योग्य आहे.” असे सवाल त्यांनी केले.”
‘पीएम केअरमधून महाराष्ट्राला केंद्राची सर्वाधिक मदत’
देवेंद्र फडणवीस म्हणतात, “पीएम केअरमधून महाराष्ट्राला केंद्रानं सर्वाधिक मदत केली आहे. तरीही केंद्र सरकार मदत करत नाही असा भास निर्माण केला जात आहे. हे योग्य नाही. स्वत:ची निष्क्रियता लवपण्यासाठी हा कांगावा केला जात आहे. कोरोना या विषयावर आम्ही कधीही राजकारण केलं नाही. यापुढेही करणार नाही. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आम्ही सरकारसोबत आहोत. सरकारनं 2 दिवसांसाठी अधिवेशन घेण्याचं ठरवलं. यासाठी अनेक अटीही घातल्या. या सर्व अटी आम्ही मान्य केल्या. म्हणजे आम्ही सरकारला सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहोत. आम्ही सहकार्य करत नाही अशी चुकीची टीका केली जात आहे.”
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याप्रकणावर फडणवीस म्हणाले…
कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबात फडणवीसांना विचारले असता ते म्हणाले, “ही उंची वाढवल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसणार आहे. या धरणाची उंची वाढवू नये म्हणून केंद्र आणि कर्नाटक सरकारकडे जो काही पाठपुरावा करता येईल तो आम्ही करू. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी यासंदर्भात जी काही कठोर भूमिका घेईल त्याला आमचा पाठींबा असेल. आम्हीही आंदोलनात पुढं असू.” असं त्यांनी स्पष्ट केलं.
‘सुशांत सिंह प्रकणात भाजपाचा काडीमात्र संबंध नाही’
सुशांत सिंह राजपूत मृत्यू आणि भाजपा या प्रकरणावर बोलताना फडणवीस म्हणाले, “अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी भाजपाला ओढण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो देखील सरकारचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी आहे. भाजपाचा या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नाही.” असा खुलासा त्यांनी केला.
मुंबईतील मेट्रोचं काम स्थगित ठेवल्यानं या प्रकल्पाचा खर्च विनाकारण वाढणार आहे. कोल्हापूरातील वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेत जिल्हा प्रशासनानं सरकारकडे आरोग्य सुविधा वाढवण्याबाबत जो प्रस्ताव पाठवला आहे तो त्वरीत मंजूर व्हावा यासाठी आपणही प्रयत्न करू असंही फडणवीस यावेळी म्हणाले.