कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ राज्यस्तरीय महामंडळाच्या सभेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिक्षकांना दिलासा दिला. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी 15 दिवसांच्या आत शालेय शिक्षणमंत्री, ग्रामविकास मंत्री, नगरविकास मंत्र्यांची बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या सभेला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, महापौर सूरमंजिरी लाटकर, पालकमंत्री सतेज पाटील, प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलातना शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीकडून शिक्षकांच्या अपेक्षा अधिक आहेत. महाविकास आघाडी सरकार शिक्षकांना रिकाम्या हाताने पाठविणार नाही. शिक्षकांच्या मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक संघ काम करीत असून सत्ता असो नसो त्यांचे नाते कायम राहिले आहे. फेब्रुवारी महिन्यात शिक्षक संघाच्या राज्य अधिवेशनास मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री उपस्थित राहतील. याप्रसंगी सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. तीन-चार आठवड्यात शिक्षकांच्या प्रश्नासाठी बैठक होईल. त्यास मी स्वत:, अन्य मंत्री व संघटनेच्या प्रमुख नेत्यांना बोलाविण्यात येईल, असे आश्वासन पवार यांनी दिल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
आम्ही शिक्षकांच्या सोबत
यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, प्राथमिक शिक्षक संघ पुरोगामी विचाराला साथ देणारा आहे. त्यांनी कधीही वेगळा विचार केला नाही. नवी पिढी घडविण्यासाठी ते वेगळ्या विचाराने पुढे जातात. तसेच ग्रामीण विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षक नवीन प्रयोग करीत आहेत. शिक्षकांच्या मागण्या सोडविण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत राहू.
बदली धोरणात बदल करू
तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, शिक्षकांच्या बदली धोरणाबाबत फेब्रुवारी 2017 च्या आदेशात बदल आवश्यक केले जातील. शरद पावर यांनी सर्वसमावेशक बदली धोरण तयार करण्यासाठी विशेष परिपत्रक काढण्याचे आदेश दिले आहेत. नवीन सचिव आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी पंधरा दिवसांत संबंधित मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू. इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा पट कमी होणार नाही, गळती वाढणार नाही, यासाठी शिक्षकांनी अपडेट राहावे. हे शासन शिक्षकांच्या मागण्यांसाठी खंबीर राहील, असे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले.
प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात म्हणाले, राज्यातील हजारो शिक्षक अस्वस्थ आहेत. फेब्रुवारी 2017 च्या आदेशाने शिक्षकांमध्ये भेदाभेद केली आहे. पुरोगामी विचारांचे महाविकास आघाडीचे सरकार आले असून पुढील पाच वर्षांत शिक्षकांचे प्रश्न टप्प्या-टप्प्याने सुटतील. बीएलओ कामासाठी शिक्षकांवर गुन्हा दाखल झाल्यास राज्यव्यापी जेलभरो आंदोलन केले जाईल, असा इशाराही थोरात यांनी दिला. यावेळी राज्य जनसंपर्क प्रमुख मोहन भोसले, संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, महापौर सूरमंजिरी लाटकर, पालकमंत्री सतेज पाटील, खा. श्रीनिवास पाटील, खा. धैर्यशील माने, आ. चंद्रकांत जाधव, आ. राजेश पाटील, आ. राजूबाबा आवळे, आ. ऋतुराज पाटील, जि.प. अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, एन. वाय. पाटील, विनोद राऊत, जनार्दन निऊंगरे, आप्पासाहेब कुल, अंबादास वाजे, रवीकुमार पाटील, लक्ष्मी पाटील, सुनीलकुमार पाटील आदी उपस्थित होते.
Visit : bahujannama.com