मंबई : बहुजननामा ऑनलाइन – मानवी हक्क कार्यकर्ता आनंद तेलतुंबडे हे दलित, आदिवासी, यांच्या हक्क विषयी सतत बोलत असतात. त्यांच्या लिखाणातून व कार्यातून ते दलित, आदिवासीचे प्रश्न मांडून त्यांच्यामध्ये जागृती करण्याचे कार्य करतात. त्यांनी जवळ जवळ २६ पुस्तकाचे लिखाण केले आहे. त्यांची आतंरराष्ट्रीय पातळीवर एक बुद्धिवादी व्यक्तिमहत्व म्हणून ख्याती आहे. तेलतुंबड़े हे गोवाच्या नामंकित इंस्टिट्यूट ऑफ मैनेजमेंट मध्ये प्राध्यापक आहेत.
डॉ. आनंद तेलतुंबडे यांना कोरेगाव भीमा हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून शनिवारी पहाटे साडेतीन वाजता मुंबई विमानतळावरून पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर दुपारी तेलतुंबडे यांना पुणे येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. अटकेची कारवाई बेकायदेशीर ठरवत पुणे येथील विशेष सत्र न्यायालयाने तेलतुंबडे यांची सुटका करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर काही वेळातच तेलतुंबडे यांची सुटका करण्यात आली होती. हे सरकार लोकशाहीचा गळा घोटू पहाते आहे. लेखक, साहित्यिक, बुद्धिजीवी, लोकांचे आवाज बंद करण्याचे काम हे सरकार करीत आहे. जो कोणी सरकार विरोधी बोलेल तो देशद्रोही आहे. अशी सरकारची भुमीका आहे.
डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या समर्थनार्थ लोकशाही हक्क संघर्ष समितीची बैठक झाली. ६ फेब्रुवारी पासून निषेध सभा आणि आंदोलने होणार आहेत. ६ फेब्रुवारीला दादरच्या आंबेडकर भवनात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शैलेंद्र कांबळे यांनी दिली. मुंबईत होणाऱ्या या सभेत साहित्यकार प्रा. प्रज्ञा दया पवार, पत्रकार हसन कमाल, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, महेंद्र सिंग, गांधीवादी विचारवंत जी. जी. पारीख, सामाजिक कार्यकर्ती तिष्ठा सेटलवाड आदी उपस्थित राहणार आहेत.
आनंद तेलतुंबडेंच्या समर्थनार्थ व भाजपा सरकारच्या दडपशाही धोरणाविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट एमएल, भारीप बहुजन महासंघ, जातीअंत संघर्ष समिती, रिपब्लिकन पँथर, आदी संघटनांनी या सभेला पाठिंबा दिला असल्याचेही मोरे म्हणाले.