मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात महाशिवआघाडी सरकार स्थापन करणार असल्याच चित्र समोर येत आहे. जयपूर येथे काँग्रेस आमदारांच्या झालेल्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर एकमत झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. यावेळी ४४ पैकी ४० आमदारांनी पाठिंबा देण्यास अनुकूलता दर्शविली आहे.
काँग्रेसच्या सर्व आमदारांची जयपूर येथे बैठक घेण्यात आली. यावेळी पक्षाचे प्रभारी खर्गे हेदेखील उपस्थित होते. याबैठकीत ४४ पैकी ४० आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यावर शिक्कामोर्तब केला आहे. मात्र हा निर्णय राखून ठेव्यात यावा असेही म्हटले जात आहे. कारण भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत कोणता निर्णय घेण्यात येतो हे पाहून काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बैठकीनंतर पुढील निर्णय जाहीर करण्यात यावा, असे आमदारांचे मत आहे.
त्याचबरोबर शिवसेनेनं सत्तास्थापनेच्या प्रस्तावाबरोबर कधी समोर येते हेदेखील पाहावे असेही या आमदारांचे मत आहे. एकूणच राज्यात भाजपचे सरकार नको, या मतावर सर्व आमदार ठाम असून शिवसेना मंत्रिमंडळात आली तर सरकार स्थिर राहील असे काही तरुण आमदारांचे म्हणणे असल्याची माहिती समोर येत आहे.