बीड : बहुजननामा ऑनलाइन – बीड जिल्ह्यातील एका तरुणाने मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे म्हणून जलसमाधी घेतली. मातंग समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्या मान्य होईपर्यंत अंत्यविधी केला जाणार नाही अशी भूमिका घेत, तरुणाचा मृतदेह केज तालुक्यातील साळेगाव येथे आणण्यात आला.
एससी आरक्षणात अ, ब, क, ड गट करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, तरुणाच्या वारसांना २५ लाख रुपये नुकसानभरपाई आणि एका व्यक्तीला नोकरी द्यावी, मुंबई विद्यापीठास अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे आणि अन्य मागणीसाठी साळेगाव (ता. केज, जि. बीड) येथील संजय ताकतोडे या तरुणाने ५ मार्च रोजी बिंदुसरा प्रकल्पात उडी मारून जलसमाधी घेतली, त्यावेळी, बुधवारी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. नातेवाईकांनी भडकलगेट येथे मृतदेह आणून ठेवल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढल्यानंतर मृतदेह घेऊन नातेवाईक बीडकडे रवाना झाले.दरम्यान तेथे त्यांचे नातेवाईक आणि मातंग समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन मृतदेह विभागीय आयुक्तालयात न्यावा आणि आपली मागणी लावून धरू असे मत मांडले. विभागीय आयुक्तालयाकडे जात असतानाच भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मृतदेह उतरवून आंदोलन सुरू करण्यात आले.
त्यावेळी नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांना नातेवाईकांनी निवेदन बुधवारी रात्री दिले. मात्र सकाळपर्यंत यावर तोडगा निघाला नव्हता. याचदरम्यान, सदरील माहिती मिळताच , उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त गोवर्धन कोळेकर, पोलीस निरीक्षक उत्तम मुळक, राजश्री आडे आदींनी धाव घेतली. खाटमोडे यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
विशेष म्हणजे, या आंदोलनाचे पडसाद इतके उमटले की, दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघांनी बसवर दगडफेक करून नुकसान केले. यामध्ये बसच्या समोरील काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले. याचबरोबर, लहूजी सेनेतर्फे साळेगावात बुधवारी रात्रीपासून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.