नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – मातंग समाजाला अ ब क ड आरक्षण वर्गीकरण करण्यात यावे यासाठी वेगवेगळी आंदोलने सुरु आहेत. तरीही मातंग समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यातील सावळा येथील संजय ताकतोडे यांनी जलसमाधी घेतली. या घटनेच्या निषेधार्थ आणि आरक्षणाच्या मागणीसाठी तामसा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरु आहे. सरकारने या मागणीकडे अद्यापही लक्ष दिले नसल्याने मातंग समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. यातूनच संजय ताकतोडे या सामाजिक कार्यकर्त्याने जलसमाधी घेतली. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत. तामसा येथेही मातंग समाजच्या वतीने तामसा बंदचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील सकल मातंग समाजाने पुकारलेल्या या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. मातंग समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या बंद दरम्यान संजय ताकतोडे अमर रहे, मातंग समाजाला अ ब क ड आरक्षणाचे वर्गीकरण झाले पाहिजे आदी घोषणा देऊन सरकारचा निषेध केला. आ. नागेश पाटील आष्टीकर, जि. प. सदस्य विजय बास्टेवाड, दिलीप बास्टेवाड यांनी संजय ताकतोडे यांना श्रद्धांजली अर्पण करुन बंदला पाठिंबा दर्शविला.
संजय ताकतोडे यांच्या कुटुंबातील सदस्याला शाासकीय नोकरी द्यावी, या कुटुंबाला सरकारकडून ५० लाखांची आर्थिक मदत द्यावी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाला निधी द्यावा, लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आदी मागण्या करुन या मागण्या मान्य न झाल्यास येत्या लोकसभा निवडणुकीवर मातंग समाज बहिष्कार टाकणार असल्याचेही मातंग समाजाच्या वतीने या वेळी सांगण्यात आले. बंद दरम्यान उमरी, एकराला, तामसा, नाव्हा, हदगाव, वडगाव, पांगरी, डोरली, भानेगाव, वाळकी आदी गावातून मातंग सामाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.