पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील भराडी येथे एका नवरी मुलीने लग्न झाल्यानंतर आठवड्यातच मावशी आजारी आहे’ असे सांगून घरातील ५ तोळे दागिने अंगावर घालून ती मुलगी पलायन झाल्याची धोकादायक घटना घडली आहे. याबाबत नितीन कांताराम कुरकुटे या तिच्या पतीने मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
अधिक माहिती अशी की, भराडी येथील नितीन कुरकुटे हे लग्नासाठी मुलगी शोधत असताना त्यांच्या ओळखीतील मध्यस्ती नवनाथ गवारी याने नितीन कुरकुटे यांना परभणी जिल्ह्यातील शिंगणापूर येथील लक्ष्मी मच्छिंद्र चव्हाण या मुलीचे स्थळ सुचवले. त्यानंतर कुरकुटे यांनी १४ मार्च २०२१ ला गवारी यांना मध्यस्थीचे दीड लाख रुपये दिले. त्यानंतर मुलीची मावशी, मामा आणि काळे नावाचा व्यक्ती यांनी ‘घाई गडबड करून आम्ही गरीब आहे’ असे सांगत, नवऱ्या मुलाचा विश्वास जुळवला. त्यानंतर १५ मार्च २०२१ रोजी भराडी येथे नवरा नितीनच्या घरी साध्या पद्धतीने विवाह करण्यात आला.
दरम्यान, लग्नानंतर आठ दिवसातच तिने ५ तोळे दागिने घालून गेली. ८ ते १० दिवस होत आले तरी ती घरी आली नसल्याने, लक्ष्मी कुठे गेली, अशी चौकशी केली असता ती आणि तिच्यासह मामा, मावशी हे शिंगणापूर येथील पत्त्यावर राहत नसून ती खोली त्याने एक दिवसासाठी भाड्याने घेतली असल्याचे कळले. त्यानंतर फिर्यादी नितीन कुरकुटे यांनी लग्न जमविणारे मध्यस्थी यांना संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत आपली फसवणूक झाल्याचे समजताच नितीन यांनी नवनाथ महादेव गवारी ( रा. गवारीमळा मेंगडेवाडी ता. आंबेगाव जिल्हा पुणे ) लक्ष्मी मच्छिंद्र चव्हाण ( मुलगी ), कमल नामदेव जाधव (मावशी), महादेव लक्ष्मण चिंचवड (मामा) व काळे नावाचा व्यक्ती सर्व रा.शिंगणापूर ) यांच्याविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली असून,पुढील तपास पोलीस करत आहेत.