मानवत (परभणी )बहुजननामा ऑनलाईन – स्वाभिमानी शेतकऱ्यांचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेकडून ,दत्तक घेतलेल्या गावातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप सुरू न केल्यास बँकेस टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता.यानंतर पाथरी येथील इंडिया बँकेने खडबडून जागे होत पीक कर्ज वाटपास सुरुवात केली. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले टाळे ठोको आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
परभणी जिल्ह्यातील सर्व बँकांनी शेतकऱ्यांना मे महिन्यापासूनच पीक कर्ज वाटपास सुरूवात केली. परंतु, पाथरीच्या इंडीया बँकेने जून महिना संपत आला, तरी एकही शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले नसल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेला समजली. त्यावर स्वाभिमानी संघटनेकडून लगेच त्यावर तोडगा काढत कामाला सुरवात केली आहे. दरम्यान ,मानवत तालुक्यातील खडकवाडी, किन्होला, जंगमवाडी, लोहरा, भोसा ही गावे पाथरीच्या इंडिया बँकेला दत्तक आहेत.
स्वाभिमानी संघटनेकडून ४ जुलैपर्यंत पीक कर्ज वाटप सुरू न केल्यास ५ जुलै रोजी बँकेस टाळे ठोकण्याचा इशारा २८ जून रोजी एका निवेदनाद्वारे बँक प्रशासनाला जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, तालुकाध्यक्ष हनुमान मसलकर, दिगंबर पवार, गणेश मसलकर, रोहिदास कदम, माणिक मसलकर आदींनी दिला होता. दिलेल्या निवेदनाची तत्काळ दखल बँक व्यवस्थापकांनी घेत ४ जुलै पासून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप सुरू केल्याने स्वाभिमानाने तात्पुरते आंदोलन स्थगित केल्याची माहिती तालुकाध्यक्ष हनुमान मसलकर यांनी दिली.