मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्य सरकारने केलेला मराठा(Maratha) आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला. यावरून राज्यात या निर्णयाबाबत मराठा(Maratha) समाजात नाराजी दिसून आली. तर याच मुद्यावरून आता राज्यसभेचे खासदार संभाजी राजे छत्रपती हे आक्रमक भूमिका घेत ५ मागण्या केल्या आहेत. त्यावेळी ते माध्यमाशी बोलत होते.
खा. संभाजी राजे छत्रपती बोलताना म्हणाले की, ६ जून रोजी शिवाजी महाराज छत्रपती झाले. आज मी घोषणा करतोय. ६ जूनपर्यंत आमच्या ५ मागण्या सरकारला मान्य झाल्या नाहीत तर ६ जूनपासून रायगडावरुन आंदोलनाला सुरुवात करु यावेळी आम्ही कोरोना बिरोना बघणार नाही, अशा शब्दात एक इशारा त्यांनी दिला आहे. पुढे ते म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना बोललो, जे तुमच्या हातात आहे, ते तुम्ही करा. मी ५ गोष्टी काढल्या त्या पूर्ण व्हायला हव्यात. आज मराठा समाज माझ्यामुळे शांत आहे, असे देखील खा. संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
पुढे संभाजी राजे म्हणाले, मराठा समाज आज अस्वस्थ आहे, आज माझ्यामुळे समाज शांत आहे. त्यांना उद्रेक करता येतो. त्यांनी रस्त्यावर उतरायचं का? यापुढे चालणार नाही. आम्ही चालूच देणार नाही. म्हणून पर्याय द्यायला हवा. आम्हाला तुमच्या राजकीय भांडणात अजिबात रस नाही. आम्हाला न्याय द्या, असे त्यांनी म्हटले आहे. खा. संभाजी राजे छत्रपती यांनी सरकार पुढे ५ मागण्या आणि ३ पर्याय सुचवलेले आहेत.
काय आहेत ५ मागण्या?
१ – ‘९ सप्टेंबर २०२० पर्यंत नियुक्त्या झाल्यात त्यांना रुजू करुन घ्या हे सांगितलं, मग राज्य सरकार थांबलंय का? लोकांच्या भावनांशी का खेळताय? गरिब मराठ्यांना न्याय द्या.
२ – शाहू महाराजांच्या नावाने सारथी संस्था उभी केलीय. परंतु, त्याची अवस्था काय आहे? सारथीला स्वायत्तता दिली तर आरक्षणापेक्षाही उत्तम ठरेल. माझं हे मोठं वक्तव्य आहे. सारथीला चालना मिळाली तर समाज बदलेल. सारथीचं अध्यक्षपद मला अजिबात नको. सारथीला १ हजार कोटी द्या. कोरोना काळात पैसा नाही म्हणता, मात्र, आम्ही योजना आखू. आता पन्नास कोटी दिले तर त्यामध्ये आम्ही काय योजना करणार? पैसे द्यायचे नसतील तर ती सारथी संस्था बंद करा. शाहू महाराजांच्या नावे अशी संस्था नको.
३ – अण्णासाहेब महामंडळातून गरीब मराठ्यांना उद्योग उभं करुन देऊ शकता. १० लाखाची मर्यादा आहे. परंतु, ही मर्यादा पंचवीस लाख करा. कर्ज काढायला गेल्यावर जमीन तारण मागतात, परंतु, जमिनीच नाहीत तर देणार काय?
४ – प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिगृह उभे करा. ते तुमच्या हातात आहे, ते करा.
५ – ७० % गरीब मराठा समाज आहे. मी शाहूंचा वंशज आहे. गरिबांवर अन्याय होऊ देणार नाही. ज्या सवलती शिक्षणामध्ये OBC ना मिळतात, त्या गरीब मराठ्यांना सुद्धा द्या.
संभाजीराजे छत्रपती यांनी सुचवलेले ३ पर्याय –
१ – तुम्ही रिव्ह्यू पिटिशन फाईल करा, लोकांना दाखवण्यासाठी नाही तर ती फुलप्रूफ हवी आहे.
२ – जर रिव्ह्यू पिटिशन टिकली नाही, तर क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करावी. हा शेवटचा पर्याय आहे.
३ – ३४२ अ तुम्ही आपलं प्रपोजल केंद्राकडे देऊ शकता. राज्यपालांच्या माध्यमातून ते राष्ट्रपतींकडे जाणार आहे. राष्ट्रपतींना योग्य वाटलं तर ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे देतील. त्यांना योग्य वाटलं तर ते संसदेकडे पाठवतील.