मुंबई/ ठाणे: बहुजननामा ऑनलाईन – मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास तात्काळ थांबवण्याचे आदेश ठाण्यातील मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टाने एटीएसला दिले आहेत. तपास थांबवून हत्या प्रकरणातील सर्व कागदपत्रे विनाविलंब एनआयएकडे सूपूर्द करावीत, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. हिरेन यांच्या हत्येचा तपास केंद्र सरकारने एनआयएकडे दिला आहे. तशी अधिसूचना यापूर्वीच काढली होती. तरीही एटीएसने तपास सुरू ठेवला आहे अन् आरोपींची कोठडीही मिळवत आहे. तपास तात्काळ थांबवून कागदपत्रे आमच्याकडे देण्याचा आदेश द्यावा, अशा विनंतीचा अर्ज एनआएने केला होता. त्यावर कोर्टाने बुधवारी (दि. 24) हा आदेश दिला.
काही दिवसांपूर्वी अंबानीच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो कार सापडली होती. ती कार मनसुख हिरेन यांची असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे ती कार तिथे कशी आली याचा तपास एनआयएनकडून सुरु असताना मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडला. त्यामुळे खळबळ उडाली होती. सुरुवातीला ही आत्महत्या आल्याचे समोर आले होते. मात्र, त्याचा खून झाल्याची शक्यता शवविच्छेदन अहवालानंतर पुढे आली. एनआयएने अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे धागे जुळवण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना या प्रकरणात अटक केली असून चौकशी त्याची कसून चौकशी सुरु आहे.