मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या खंडणीच्या आरोपावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकास भिडले आहे. तर राज्य शासनाने पोलीस अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्यांवरुनही विरोधकांनी राज्य सरकारला घेरलं आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे. तर, मी जर सरकारमध्ये असतो तर परमबीर सिंह यांची बदली केली नसती तर त्यांना निलंबीतच केलं असतं, असे भाष्य पटोले यांनी केले आहे.
राज्याच्या घडामोडीवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषदा घेत महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत. तर यानंतर नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्यांवर निशाणा साधला आहे. तसेच, भाजपने महाराष्ट्राला बदनाम करण्याचा ठेका घेतला आहे, अशी बोचरी टीका पटोले यांनी केली आहे. परमबीर यांच्या बदलीबाबत पटोले यांना प्रश्न विचारले असता. मुंबईसारख्या संवेदनशील ठिकाणी या पद्दतीने वागणारे अधिकारी असतील तर मी बदली केली नसती निलंबितच केलं असतं, असे ते म्हणाले. तर अधिकाऱ्यांनी कोणाची बाहुली बनू नये. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. फडणवीसांनी रश्मी शुक्लांचा उल्लेख केला. आता या पद्धतीच्या अधिकाऱ्यांचा वापर भाजप करत असेल तर ही एक गंभीर बाब आहे. हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही, असे पटोले बोलताना म्हणाले.
दरम्यान, केंद्राचा दबाव आणून IPS अधिकाऱ्यांचा वापर केला जातो आहे. आज भाजपच्या शिष्टमंडळांनी राज्यपालांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालावं असं एक निवेदन दिलं आहे. त्यावरही पटोले म्हणाले, राजभवन हे भाजपचं कार्यालय झालं आहे. राज्यपालांची भूमिका संशयास्पद आहे. अशी शंका उपस्थित करत नाना पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.