नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत पश्चिम बंगालचं नाव बदलण्याची मागणी केली. त्याचबरोबर मोदींना नवरात्रीनंतर पश्चिम बंगाल भेटीचं आमंत्रणदेखील दिलं. काही महिनयांपूर्वीच लोकसभा निवडणुकीवेळी ममता बॅनर्जी यांचा तृणमूल पक्षात आणि भाजपमध्ये घमासान युद्ध सुरु होत. परंतु आता मोदी-बॅनर्जी यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन ममता यांनी कुर्ता आणि मिठाई भेट दिली. त्यानंतर चर्चा करत ममता यांनी पश्चिम बंगालचं नाव बदलण्याची मागणी केली. पंतप्रधान मोदींनीही आपली ही मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्याचं ममता यांनी सांगितलं. तसेच मोदींकडे राज्यातील विकासासाठी १३,५०० कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणीहि केली असल्याचं ममता यांनी सांगितलं.
‘मोदींबरोबरची आजची भेट ही राजकीय भेट नव्हती. मी दिल्लीला नेहमी येते. तेव्हा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत असते. यावेळी अर्थमंत्र्यांशी भेट होऊ शकणार नाही. कारण राज्याचे अर्थमंत्री आलेले नाहीत, असे ममता यांनी सांगितले आहे. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेण्याची इच्छाही व्यक्त करत, शहा यांनी वेळ दिल्यास उद्या त्यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी मोदींना नवरात्रीनंतर पश्चिम बंगालमध्ये येण्याचं आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या कोल ब्लॉकचं उद्घाटन करण्याचं निमंत्रणही दिलं.