मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये जागावाटपावरून फूट पडली होती. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला 8 जागांची ऑफर दिली. त्यांनी आपल्याला सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही असं सांगत वंचितमधून बाहेर पडल्याचं एमआयएमनं जाहीर केलं होतं. परंतु आता एमआयएमला 8 जागांचा प्रस्ताव दिलाच नाही असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. इतकेच नाही तर एमआयएमला अजूनही आमचे दार खुले आहे असं आंबेडकर म्हणाले आहेत.
‘वंचित बहुजन आघाडीने एमआयएमला 8 जागांचा प्रस्ताव दिलाच नव्हता’
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “वंचित बहुजन आघाडीने एमआयएमला 8 जागांचा प्रस्ताव दिलाच नव्हता. त्यांच्यासोबत युती बाबत चर्चा सुरू होती. परंतु अचानक त्यांनी युती होणार नसल्याचं जाहीर केलं. वंचित सोबत न येण्याचा निर्णय त्यांचा आहे. असं असलं तरी आमचं दार त्यांच्यासाठी अजूनही खुलं आहे.” असं आंबेडकरांनी स्पष्ट केलं.
‘असुदुद्दीन ओवेसी जागांबाबत तडजोड करण्यास तयार’
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जागावाटपावरून वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये ठिणगी पडली होती. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आघाडी तुटल्याची घोषणा केली. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही दोन्ही पक्षात फूट पडल्याची अधिकृत घोषणा केली होती. एनडीटीव्ही आणि पीटीआयच्या वृत्तानुसार, आता हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणूक एकत्र लढणार असल्याचे संकेत मिळाले होते. खासदार इम्तियाज जलील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला होता. वंचित आघाडीसोबत जाण्यावर पक्ष पुर्नविचार करीत आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनीही जागांबाबत तडजोड करण्यास तयारी दर्शवली आहे.
‘वाटपावर तोडगा काढला, तर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची आमची इच्छा’
पीटीआयशी संवाद साधताना जलील म्हणाले होते, “एमआयएम-वंचितमध्ये आघाडी होणं अवघड आहे असे मला वाटत नाही. मोठा भाऊ म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपावर तोडगा काढला, तर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची आमची इच्छा आहे. प्रकाश आंबेडकरांनी असदुद्दीन ओवेसींसोबत पुन्हा चर्चा करण्याची तयारी दर्शवली तर आम्ही तयार आहोत.”
Visit : bahujannama.com