सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – अंगी गुण असले, वीरश्री असली तर एक सामान्य मुलगा भारताच्या इतिहासाला घडवणारा महानायक कसा बनू शकतो हे मल्हाररावांनी सिद्ध करून दाखवले असे प्रतिपादन विशाल मेटकरी यांनी केले. फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज, सांगोला मध्ये मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी मेटकरी बोलत होते.
संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर भाऊसाहेब रुपनर, कार्यकारी संचालक दिनेश रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली व कॅम्पस डायरेक्टर संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिरुद्ध महात्मे यांच्या हस्ते सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विशाल मेटकी म्हणाले, सुभेदार मल्हारराव होळकर (१६ मार्च १६९३ – २० मे १७६६) हे मूळचे महाराष्ट्रातील होळ या गावचे असून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या मावळ प्रांताचे पहिले सुभेदार होते. बाळाजी विश्वनाथ यांनी मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा असलेल्या मल्हाररावांना इंदूर संस्थानाची जहागिरी दिली. मल्हारराव आपल्या पराक्रमाने, कसलीही घराणेशाहीची परंपरा नसतांना स्वबळावर पुढे येत मराठेशाहीचे मुख्य आधारस्तंभ बनले. ते एक धोरणी, मुत्सद्दी व शिवरायांच्या गनिमी काव्याला अंगीकारणारे सेनानी होते. इसवी सन १७५८ मध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकाविले. अशी माहिती मेटकरी यांनी उपस्थितांना दिली. या कार्यक्रमासाठी पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.शरद पवार, ॲडमिन प्रा.हेमंत सर्जे, अकॅडमिक डीन प्रा.टी एन जगताप, स्टुडन्ट कॉ-ओर्डीनेटर प्रा.प्रवीण ढवळे, स्कूलचे सीईओ प्रा.अभिजित नष्टे आदी उपस्थित होते.