बेंगळुरू : वृत्तसंस्था – भारत आणि मलेशिया दरम्यान सुरु असलेल्या वादाचा परिणाम आता दक्षिण भारतातील खाद्य संस्कृतीवर होत आल्याचे दिसून येत आहे . लोकप्रिय खाद्य इडली डोसा याच्या किमतींवर या वादाचा परिणाम होणार आहे. कारण हे पदार्थ करण्यासाठी मोठ्याप्रमाणात पाम तेल वापरले जाते आता पाम तेलावरील कर वाढवल्यामुळे सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याचे रेस्टॉरंट्सचे म्हणणे आहे. दरम्यान, या समस्येशी लढण्यासाठी हॉटेल असोसिएशनने कॉफी, इडली, वडा, डोसा या लोकप्रिय पदार्थांच्या किंमती वाढवण्याची मागणी केली आहे. किमतीत वाढ न झाल्यास आम्हाला व्यवसाय चालविणे फारच अवघड जाईल, असे हॉटेल असोसिएशनचे म्हणणे आहे.
नक्की काय आहे वाद
मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि काश्मीरबाबत विधान केल्यानंतर भारताने मलेशियातून पाम तेल आयात केले नाही. यामुळे खाद्यतेलांची किंमत सातत्याने वाढत आहे. कर्नाटकात एकूण ३० हजार रेस्टॉरंट्स आहेत, त्यापैकी ८ हजार फक्त बंगळुरूमध्ये आहेत. पामतेलाची आवक घटल्याने कॉफीच्या किंमतीत दोन रुपायांची, इडली-वड्याच्या किंमतीत पाच रुपयांची आणि डोश्याच्या किंमतीत दहा रुपयांची वाढ करण्याची योजना असल्याचे हॉटेल संघाने म्हटले आहे.
वाढलेल्या किमतींचा ग्राहकांवर परिणाम
सर्व रेस्टॉरंट्सने अद्याप किंमत वाढविण्याचा निर्णय घेतलेला नाही. किमती वाढल्याने ग्राहक नाराज होतील अशी भीती रेस्टॉरंट्सना वाटते आहे. या उपाय म्हणून रेस्टॉरन्ट्सनी आपले खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. खाणे वाया जाणे टाळल्यास किंमतीत होणारी वाढ रोखता येईल असे त्यांचे म्हणणे आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी लहान ग्लास वापरण्याचा फंडा
एका रेस्टॉरंटने पिण्याच्या पाण्याचे लहान ग्लास ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुतेक लोक अर्धा ग्लास पाणी पितात आणि अर्धा ग्लास पाण्याचा अपव्यय करतात. ग्लास लहान ठेवल्यास पाणी आणि पैशांची बचत होईल, असे काही रेस्टॉरंट्सना वाटते.