बहुजननामा ऑनलाइन – उत्तर प्रेदशमध्ये 2 दिवसात 3 मुलींवर बलात्कार झाला. राजस्थानातही अशीच घटना घडली. यावर आयुष्यभर अहिंसेची शिकवण देणारे बापू(mahatma gandhi )काय सांगतात माहित आहे का ? एका पत्रात महात्मा गांधी(mahatma gandhi )यांनी याबाबत सल्ला दिला आहे.
महिलांविरोधातील अत्याचार आणि गुन्ह्यांवर गांधी यांचे विचार स्पष्ट होते. मुलांना त्यांनी या संदर्भात एक पत्र लिहलं होतं. यात त्यांनी महिलांनी आत्मसंरक्षणासाठी जे काही करावं लागेल ते करावं असा सल्ला दिला होता. बलात्कार झालेल्या स्त्रीचा कोणत्याही प्रकारे तिरस्कार केला जाऊ नये असं त्यांचं मत होतं. त्यांनी आपल्या मुलांनाही महिलांसोबत आदरपूर्वक वागण्याची सक्त ताकीद दिली होती. आपल्या मर्यादांचं उल्लंघन करू नये असं त्यांनी म्हटलं होतं.
द माईंड ऑफ महात्मा गांधी पुस्तकात वाईट प्रवृत्ती आणि महिलांवरील अत्याचारावर गांधींचे विचार मांडण्यात आले आहेत. यानुसार गांधींनी म्हटलं आहे की, जर महिला हल्लेखोराच्या शारीरिक ताकदीला प्रतिकार करू शकत नसेल तर तिचे पावित्र्यच तिची ताकद बनेल. सीतेचे उदाहण घ्या. शारीरिकदृष्ट्या सीता रावणासमोर शक्तीहीन होती. मात्र तिची पवित्रता रावणाच्या ताकदीपेक्षा जास्त शक्तीशाली होती. रावणानं अनेक प्रलोभनं देऊन तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र सीतेला तो हातही लावू शकला नाही. मााझ्या मते निडर महिलेला हे कळतं की, तिचे पावित्र्य तिची सर्वात मोठी ढाल आहे. मनुष्यच नाही तर अग्नीही तिच्यासमोर लाजेल असं गांधींनी म्हटलं होतं.
महिलेच्या प्रश्नांना गांधींचं खुलं उत्तर
एका महिलेनं बापूजींना 3 प्रश्न विचारले. यावर त्यांनी दिलेले उत्तर खरंच विचार करायला लावणारं होतं. गांधींनी 1942 मध्ये हरिजनबंधू या गुजराती नियतकालिकेच्या माध्यमातून हे उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते की, “ज्या महिलेवर बलात्काराचा प्रसंग ओढवला ती तिरस्काराच्या नाही तर दयेची पात्र आहे. ती स्त्री जखमी झालेली असते. ज्याप्रकारे आपण जखमींची सेवा करतो त्याचप्रमाणे तिचीही सेवा केली पाहिजे. शील भंग कोणाचं होतं जी स्त्री शारीरिक संबंधांना तयार होते तिचं. बलात्कार झालेली स्त्री त्या नराधमाला विरोध करते. त्यामुळं शील भंग हा शब्द बदनामी करतो. त्यामुळं बलात्कार हा योग्य शब्द त्या स्त्रीसाठी वापरला जावा” असंही ते म्हणाले होते.
आजच्या जगात गुन्हेगारी एवढी वाढली आहे की, बापूंचे विचार समजून त्याचे आचरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.