बहुजननामा ऑनलाईन : सामान्य लोकांचे पैसे बँक खात्यात सुरक्षित ठेवण्यासाठी आरबीआयने डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या वापरावर नवीन नियम लागू केले आहेत. या अंतर्गत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. याबाबत आरबीआयने आपल्या ट्विटर हँडलवर महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. आरबीआयने तातडीने तीन कामे करण्याचा सल्ला दिला आहे. पहिले म्हणजे व्यवहारासाठी रोजची मर्यादा सेट करा. दुसरे म्हणजे देशांतर्गत/ आंतरराष्ट्रीय वापरासाठी मर्यादा सेट करा आणि तिसरे काम म्हणजे आंतरराष्ट्रीय वापर चालू/ बंद करा.
रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे की असे केल्याने बँक ग्राहकांचे फसवणूकीमुळे होणारे नुकसान आणि होणारे खर्च या दोघांवर मर्यादा येतील. या संदर्भात एसबीआय, बीओबी, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेनेही ग्राहकांना मॅसेज पाठवले आहेत. त्यात म्हटले आहे की त्यांच्या क्रेडिट व डेबिट कार्डवरील काही सेवा 1 ऑक्टोबरपासून बंद केल्या जात आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवहार सेवा देखील समाविष्ट आहेत.
सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास आता बँक ग्राहक स्वत:च एटीएम आणि क्रेडिट कार्ड मर्यादा ठरवू शकतात. समजा आपल्याला वाटत असेल की आपल्या कार्डवरून एक हजाराहून अधिक रक्कम काढता येऊ नये तर ते इंटरनेटमधील मॅन्युअलमध्ये प्रविष्ट करुन व्यवहार मर्यादा बदलू शकतात. आपण कधीही मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग, एटीएम मशीन किंवा आयव्हीआरद्वारे आपल्या कार्डची मर्यादा बदलू शकता.
ही सुविधा 24 तास आणि आठवड्याच्या सातही दिवस उपलब्ध असेल. म्हणजेच, आता आपण आपल्या एटीएम कार्डची व्यवहार मर्यादा स्वत: ठरवू शकता. आरबीआयने ग्राहकांना कोणती सेवा चालू ठेवायची व कोणती सेवा बंद करायची याबाबतीत त्यांच्या सोयीनुसार निर्णय घेण्यास सांगितले आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्ड देताना आता ग्राहकांना फक्त घरगुती व्यवहारासाठी परवानगी मिळेल. याचा अर्थ असा की गरज नसल्यास एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी आणि पीओएस टर्मिनल्सवर खरेदी करण्यासाठी परकीय व्यवहारास मान्यता दिली जाणार नाही.