नागपूर बहुजननामा ऑनलाईन – ‘देशाचे संविधान वाचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेससोबत यावे, ही आमची इच्छा आहे पण प्रकाश आंबेडकरांची सध्या जी भाषा बोलत आहेत त्यावरून ते आमच्यासोबत येतील, असे दिसत नाही. वंचित आघाडी ही भाजपची बी टीम आहे, असे मी म्हणणार नाही. कारण तसा पुरावा नाही.पण, सी, डी, ई, एफ… असे काहीतरी नक्कीच आहे अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
यंदाच्या लोकसभेत ज्याप्रमाणे भाजपचा फायदा केला त्याप्रमाणे आगामी विधानसभेतही भाजपचाच फायदा करणार, असे दिसतेय. एकंदरीतच काय तर ‘वंचित’चं कदाचित ठरलंय,’’ पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर वडेट्टीवार आज प्रथमच विदर्भात आले त्यावेळी पत्रकारांशी सवांद साधताना ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला ६.७ टक्के मते मिळाली आणि आम्हाला १५ टक्क्यांपेक्षा जास्त मते आहेत. या टक्केवारीचा विचार करूनच त्यांनी अपेक्षा ठेवली पाहिजे. पण आम्ही काँग्रेसला ४० जागा देतो असा हासास्पद प्रस्ताव आंबेडकर यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांची मनापासून आघाडीत येण्याची इच्छा दिसत नसल्याचेही वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.
यंदाच्या अधिवेशनात एकही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. ३०-३५ वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता आहे. दर वर्षी नाल्या स्वच्छतेसाठी १२५ कोटी रुपये खर्च केले जातात. तरीही दर वर्षी मुंबई पाण्यात बुडते. याला काय म्हणावे. पहिल्याच पावसात मुंबईत ३६, भिवंडीत १५, रत्नागिरी जिल्ह्यात धरण फुटून २८ जणांचे जीव गेले. हे सर्व सरकारच्या दुर्लक्षाचे बळी आहेत. निवडणुकीच्या यशाच्या धुंदीतून सरकार अद्याप बाहेर पडले नसल्याचा टोला हाणत या सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.