मुंबई बहुजननामा ऑनलाईन- वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या लोकसभेत जी ताकद प्रस्थापित पक्षांना दाखवुन दिली त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणारा ठरेल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. २०१४ च्या विधानसभेत स्वबळावर लढलेल्या राज्यातील चारही प्रमुख पक्षांना बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. त्यामुळे भाजपने शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन केले होते. यावेळी राज्यातील निवडणुकांमधये वंचित बहुजन आघाडी रिंगणात उतरणार असून या आघाडीमुळे अनेक राजकीय वंचितांना आधार मिळण्याची शक्यता आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मध्ये स्वबळावर लढणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांना ऐनवेळी उमेदवारांसाठी धावपळ करावी लागली होती. अनेक ठिकाणी मिळेल त्याला उमेदवारी देण्यात आली.मात्र यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावेळी पेक्षाही यंदाची परिस्थिती वेगळी आहे. उमेदवारी देण्यावरून मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे सहाजिकच बंडखोरांची संख्या वाढणार आहे त्यामुळे वंचितला उमेदवार शोधण्यासाठी फारशी कसरत करावी लागणार नाही. २०१९ विधानसभा निवडणुकीत देखील भाजप आणि शिवसेना स्वतंत्रच लढणार असा अंदाज अनेक नेत्यांनी बांधला. त्यानुसार त्या नेत्यांनी पक्षांतर केले. मात्र आता युती, आघाडी होणार हे निश्चित असल्याने अनेक नेत्यांची अडचण होणार आहे. परंतु, अशा स्थितीत सापडलेल्या नेत्यांना नव्याने उदयास आलेली मुस्लीम-दलितांची वंचित बहुजन आघाडी पर्याय म्हणून समोर येण्याची शक्यता आहे.
लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढविणाऱ्या वंचितने लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगलेच जेरीस आणले. त्यावेळी वंचितला अनेक ठिकाणी उमेदवारांची कमतरता भासली होती. त्यातच युती आणि आघाडीमुळे चित्र बदलले असले तरी वंचितने २८८ जागा लढविल्यास, सर्वच राजकीय पक्षातील उमेदवारीपासून वंचित असलेल्या नेत्यांना ‘वंचित’चा आधार मिळणार हे मात्र निश्चित आहे.