बुलढाणा बहुजननामा ऑनलाईन – महसूल प्रशासनाने गेल्या आठ महिन्यांपासून समाजाला रोजगार उपलब्ध होण्यासाठी रॉयल्टी माफ केली नाही त्यामुळे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी ३ जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर दगड फोडो आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार ७ मार्च २०१५ ते १२ जानेवारी २०१८ पर्यंत जिल्हा प्रशासनाने वडार समाजाला रोजगार उपलब्ध होण्यासाठी रॉयल्टी माफ केली आहे. परंतु गेल्या आठवड्यापासून महसूल विभागाने राजपत्राप्रमाणे वडार समाजाला २०० ब्रास रॉयल्टी माफ करण्यापासून व रोजगारापासून वंचित ठेवले आहे. याबाबत संघटनेच्या वतीने वेळोवेळी मागणीदेखील करण्यात आली मात्र महसूल प्रशासनाने कोणताही तोडगा काढला नाही. त्यामुळे वडार समाजातील हजारो मजूर कामापासून वंचित आहेत. मजुरांना रोजगार उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती कुटुंबे विस्थापित झाली असून मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे बहुजन मुक्ती मोर्चा वडार समाजाच्या वतीने ३ जुलैपासून बेमुदत दगडफोड आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष शेषराव पवार,भूमी मुक्ती चे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे यांच्यासह किसन गुंजकर, तुळशीराम गुंजकर, सखुबाई चव्हाण ,लिलाबाई झुरे, रूपाली धनवटे, मालाबाई धोत्रे ,सदाशिव जाधव,एकनाथ पवार ,संजय धनवटे ,आदी सहभागी झाले होते.