मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्रात लॉकडाऊन ( Lockdown ) १ जून पर्यंत लागू केला गेला. आता १ जूनचा लॉकडाऊन पुढे वाढवणार का असा लोकांमध्ये संभ्रम होता. आता लॉकडाऊन बाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट माहिती दिलीय. पॉझिटिव्हिटी रेट जास्त असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पंधरा दिवसांसाठी लॉकडाउन वाढवला जाईल. असे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
राजेश टोपे हे पुण्यात साखर संकुलमध्ये बैठकीदरम्यान माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट अजूनही अधिक आहे, त्या ठिकाणी आणखी १५ दिवस लॉकडाउन वाढणार हे जवळपास निश्चित आहे. परंतु, जिथे कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे तिथे काही प्रमाणात शिथिलता मिळू शकते. मात्र, संपूर्ण लॉकडाउन उठवण्याचा प्रश्नच येत नाही, असं राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे.
या दरम्यान, राज्यात कोरोनाच्या संकटांनंतर आता म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. अशी परिस्थिती पाहता १ जूननंतर राज्यात लॉकडाउन वाढवणार असून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती राजेश टोपेंनी गुरुवारी दिली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीत गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान म्युकरमायकोसिसच्या संकटाचा धोका लक्षात घेऊन लॉकडाउनमध्ये १५ दिवस वाढ करण्याबाबत सहमती दर्शवण्यात आली आहे. तसेच, काही निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येणार असून, दुकानांच्या वेळा वाढविण्यासह इतर काही सवलती देण्याचा प्रस्ताव आहे. उपनगरी रेल्वे प्रवासावरील निर्बंध मात्र कायम राहणार असल्याचं बैठकीत चर्चा झालीय.