मुंबई : बहुजननामा ऑनलाइन : अभिनेते, समाजसेवक , क्रीडापटू आणि राजकारण हे समीकरण देशाला काही नवं नाही. याआधीही अनेक क्रीडापटूंनी राजकीय मैदानात उतरून निवडणूका गाजवल्या आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर यांनी भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला. त्यानंतर महाराष्ट्राची नावाजलेली धावपटू कविता राऊत हीदेखील आता राजकीय मैदानात धावणार असल्याची माहिती मिळाली आहे.
भाजपने विधानसभा निवडणुकीआधीच दिग्गज नेत्यांना आपल्याकडे खेचत काँग्रेस-राष्ट्रवादीला अडचणीत आणले आहे. भाजपच्या या खेळीला आऊटगोईंग झालेल्या मतदारसंघात प्रत्युत्तर देण्यासाठी आघाडीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केलेल्या आमदार निर्मला गावित यांच्याविरोधात धावपटू कवित राऊतला उतरवण्याचा प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून सुरू आहे.
कविता राऊत हिला विधानसभेच्या मैदानात उतरवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तरीही कविता राजकारणात प्रवेश करणार कि हे अद्याप तरी निश्चित झालेलं नाही. ‘उमेदवारीचा प्रस्ताव अद्याप आमच्याकडून आलेला नाही. मात्र असा प्रस्ताव आल्यास नक्कीच सकारात्मक विचार करू,’ अशी प्रतिक्रिया कविता राऊत हिच्या पतीने दिली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत धावपटू कविता राऊत राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान नंदूरबारमधून सलग ९ वेळा काँग्रेसच्या तिकीटवार निवडून आलेले माजी खासदार आणि माजी मंत्री माणिकराव गावित यांच्या कन्या आणि इगतपुरीच्या विद्यमान काँग्रेस आमदार निर्मला गावित यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसची साथ सोडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. परिणामी, या मतदारसंघात गावित यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यामुळे येत्या काळात कविता राऊत काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार का, हे पाहावं लागेल.