बहुजननामा ऑनलाईन – सध्या राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्षांतराचा मार्ग निवडत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांचे निकटवर्तीय राहिलेले माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील कुटुंबातील वाद चांगलाच चिघळला आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवर चांगलाच प्रत्युत्तर दिला आहे. यावर बोलताना डॉ. पाटील म्हणाले, पक्षांतर्गत कुरघोड्यांना पायबंद घातला असता तर पक्षावर ही वेळ आली नसती.
यावर बोलताना डॉ. पद्मसिंह म्हणाले, “सुप्रिया माझ्या मुलीसारखी आहे. त्यांनी माझी काळजी व्यक्त करताना वस्तुस्थितीला धरून मत व्यक्त केले असते तर फार आनंद वाटला असत. जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी मिळून पक्षबदलाचा आग्रह धरला होता. म्हणूनच आम्ही सर्वांनी मिळून राणांच्या पक्षांतराचा निर्णय घेतला होता. म्हणूनच यावेळी मी स्वतः हा तुळजापूरपर्यंत जाऊन त्यांना आशिर्वाद दिले होते. त्याआधीही ३१ ऑगस्टला झालेल्या मेळाव्यात मी राणांना त्यांच्या राजकीय वाटचालीस आशीर्वाद दिले होते आणि राणांच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन ही समर्थकांना केले होते. मी २०१४ पासून प्रकृतीच्या कारणामुळे राजकारणात सक्रिय नाही. त्यामुळे माझ्या पक्षप्रवेशाचा प्रश्नच नव्हता. ही गोष्ट सुप्रियांना देखील माहित आहे.
असे असताना देखील सुप्रियाने माझा पक्षप्रवेश रोखण्याबाबतचे विधान करणे योग्य नव्हते. माझ्यापेक्षा सुप्रियांनी पक्षातील नेत्यांची काळजी घेतली असती तर आज पक्षांतर्गत कुरघोड्यांना वेळीच पायबंद घातला असता तर पक्षावर कदाचित आज ही वेळ आली नसती, असे पद्मसिंह पाटील यांनी म्हटले आहे. डॉ. पद्मसिंह पाटील आणि राणा पाटील यांच्या भाजप प्रवेशावर सुप्रिया सुळे यांनी खोचक टीका केली होती. राणा पाटील यांनी वडिलांना अर्ध्या रस्त्यावर सोडून भाजपात प्रवेश केला. तर डॉ. पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असल्याने त्यांना भाजपने प्रवेश देण्यास नाकारल्याचे वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केले होते.