धुळे : बहुजननामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीत किमान ७० टक्के विखुरलेली मते एकत्र आणायची असतील तर प्रकाश आंबेडकरांनी महाआघाडीत यावे. एकत्र आल्यास युतीचा पराभव अटळ आहे. त्यासाठी सर्व पुरोगामी विचारांच्या पक्षांनी एकत्र एकत्र मोट बांधूया, असे जाहीर आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज येथे केले. तसेच केंद्र, राज्यातील भाजप सरकारांलाही चांगलेच धारेवर धरले .
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वमीवर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आज दुपारी “एसएसव्हीपीएस’ कॉलेजच्या मैदानावर कॉंग्रेसची सभा झाली. त्यावेळी श्री.चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, की राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली आहे. तरीही राज्यात इतर पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी करावी. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने सोबत यावे, अशी अपेक्षा असून तशी विनंती श्री. आंबेडकर यांना केली आहे. अन्यथा, त्याचा भाजपचा फायदा होण्याची शक्यता असेल. वंचित बहुजन आघाडीच्या जागेसंदर्भातील प्रश्न मान्य करायला तयार आहोत. त्यांना चार जागा देऊ केल्या आहेत. तसेच सीपीएम, शेकाप, राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना कॉंग्रेस आघाडीसोबत यायला तयार आहे, असेही चव्हाण बोलले .
पुलवामा येथील झालेल्या भ्याड हल्ल्यात देशाचे जवळपास ४४ जवान शहीद झाले. ही अतिशय दुःखद घटना आहे. मात्र भाजप याचे राजकारण करून राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा विषय जोरात वाजवावा म्हणजे कर्नाटकात 22 जागा येतील, असे येडीयुरप्पा म्हणतात. असे म्हणताना त्यांना लाज वाटली पाहिजे. सैनिकांची चिता जळते व “ते’ लोकसभेच्या जागा मोजत आहेत, हे देशाचे खूप मोठे दुर्दैव असल्याचे श्री. चव्हाण म्हणाले.