वृत्तसंस्था – देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हरीद्वारमध्ये कुंभमेळयाचे आयोजन करावे की नाही याबाबत मतमतांतरे असतानाच उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी कोरोना असला तरी कुंभमेळ्याचे भव्यदिव्य आयोजन केल पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री रावत हे कोरोनामधून पूर्णपणे बरे झाले असून सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. मात्र अशाच एका सर्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी कोरोनातही महाकुंभचे आयोजन करणे बरोबर असल्याचे म्हटले आहे. महाकुंभ हा काही दरवर्षी येत नाही. 12 वर्षातून एकदाच येतो आणि तो हरिद्वार, बनारस आणि उज्जैनमध्येच होतो. त्यामुळेच महाकुंभचे भव्यदिव्य आयोजन केले पाहिजे, असे ते म्हणाले. कोरोनामुळे संपूर्ण जग त्रासले आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपण त्याच्याविरोधात लढाई यशस्वीपणे लढत असल्याचेही रावत यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंधांसह हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या तीरावर 1 एप्रिलपासून कुंभमेळ्याला विधीपूर्वक सुरुवात झाली आहे. मेळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडच्या सीमांवर, उत्तर प्रदेशच्या रुरकीतील नरसन आणि उधमसिंगनगर जिल्ह्यातील काशीपूर येथे कडक तपासणी केली जात आहे. ज्यांच्या आरटी-पीसीआर चाचणी अहवाल नकारात्मक आहे, अशांनाच प्रवेश दिला जात आहे. तसेच लसीचा पहिला डोस घेतलेल्या भाविकांसाठीही हा नियम लागू असून सर्व भाविकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे, उत्तराखंड उच्च न्यायालयाने म्हटले आहे.