नवी मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सनदशीर मार्गाने प्रयत्न करूनही मराठा समाजाच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे समाजाच्या मागण्या लोकसभेत यशस्वीपणे मांडण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र पुरस्कृत अपक्ष उमेदवार लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. संभाव्य उमेदवारांच्या नावाची घोषणा कोपरखैरणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी केली.
ठाणे लोकसभा मतदारसंघातून स्वत: विनोद पोखरकर, ईशान्य मुंबईतून रेहा कुर्हाडे, उत्तर पश्चिम मुंबईतून सुहास बागल, माढा मतदारसंघातून संदीप पोळ तर उत्तर मुंबईमधून अमोल जाधवराव हे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
कोपर्डी बलात्कार प्रकरणानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. या घटनेतील आरोपींना फाशी, मराठा आरक्षण, अॅट्रॉसिटीचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी कायद्यात बदल, कर्जमाफीसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणे अशा विविध मागण्या घेऊन शांततेच्या मार्गाने ५८ मोर्चे निघाले. या मोर्चांनंतरही सरकारने मराठा समाजाला न्याय दिला नाही. मागण्या मान्य होत नाही म्हणून आंदोलने केली. नंतर सरकारने आरक्षण जाहीर केले तेही कोर्टात अडकुन आहे त्याचा निकाल अजून झाला नाही .
परिणामी लोकसभेत समाजाच्या मागण्या मांडण्यासाठी उमेदवार उभे करत आहोत आणि या निवडणुकीनंतरही सरकारने मागण्या मान्य न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने २८८ मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले जातील, असा इशाराही यावेळी पोखरकर यांनी दिला.