लातूर : बहुजननामा ऑनलाईन – देशाचा मूळ धर्म असलेला लिंगायत समाज हा उपेक्षित झाला आहे. त्याला अपेक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून काम करणे आवश्यक आहे. लिंगायत स्वतंत्र धर्म हा मागून मिळणार नाही, तर याकरता राजकीय अस्तित्व निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे मत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी व्यक्त केले. १७ फेब्रुवारीला होणाऱ्या लिंगायत धर्म महासंमेलनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते.
गेल्या साडेचार वर्षात जे मिळाले नाही, ते ६ महिन्यांमध्ये सरकारकडून मिळेल, अशी अपेक्षा न बाळगण्यासही सांगितले. स्वातंत्र्यापुर्वी लिंगायत धर्माला राजमान्यता होती. मात्र, त्यामधून समाजाला वगळले असून पुन्हा लढा उभारणे आवश्यक आहे. आतापर्यंत देशाच्या गृहराज्यपदापर्यंतची पदे लिंगायत समाजातील नेत्यांनी भूषवली आहेत. परंतू समाजाचे हीत न जोपासता त्यांनी स्व:हितावर भर दिला असल्याचे सांगत त्यांनी माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांना टोला लगावला.
आज प्रत्येक समाज आरक्षणासाठी आग्रही आहे. मात्र, ज्या समाजाला राजमान्यता होती, तो समाज आपल्या हक्कापासून वंचित राहत आहे. केवळ आश्वासनापलिकडे पदरी काहीच पडलेले नाही. त्यामुळे पुन्हा संघटीत होऊन देशाच्या राजकारणात समाजाचे प्रतिनिधी पाठवणे गरजेचे झाले आहे. असे झाले तरच स्वतंत्र धर्म आणि प्रत्येक क्षेत्रात योग्य वाटा मिळेल.
१७ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या लिंगायत धर्म महासंमेलनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. ‘एक हाक, खंबीर साथ’चा जयघोष करत हे महासंमेलन पार पडणार असून समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी केले.