नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आर्थिक मंदी 2019-20 या आर्थिक वर्षात वर्चस्व गाजवत होती. यामुळे मोठ्या प्रमाणात टाळेबंदी किंवा पगार कपात करण्यात आला. त्याचबरोबर लोकांची आर्थिक स्थितीही कमकुवत होऊ लागली. अशा परिस्थितीत लोकांनी विम्याचा आग्रह धरला आहे. यामुळेच देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) विक्रमी पॉलीसींची विक्री केली आहे. आकडेवारीनुसार, एलआयसीने आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 2.19 कोटी नवीन विमा पॉलिसींची विक्री केली. गेल्या सहा वर्षातील ही सर्वाधिक संख्या आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी कोविड -19 संकट असूनही कंपनीने हा विक्रम केला आहे.
एलआयसीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 2019-20 मध्ये नवीन पॉलिसीवर मिळालेल्या प्रीमियमच्या आधारे नवीन व्यवसायामध्ये 25.17 टक्के वाढ नोंदली गेली. 31 मार्च 2020 पर्यंत कंपनीला 1.78 लाख कोटी रुपयांचा नवीन प्रीमियम मिळाला. या काळात कंपनीची बाजारातील हिस्सेदारी 68.74 टक्के होती.
विशेष म्हणजे याच आर्थिक वर्षात एलआयसीचा आयपीओ येणार आहे. या माध्यमातून सरकार शेअर्सची विक्री करुन पैसे गोळा करेल. त्याचबरोबर गुंतवणूकदारांसाठी देखील ही एक संधी बनेल. गुंतवणूकदार आयपीओद्वारे गुंतवणूक करून कमाई करू शकतात. दरम्यान 1956 मध्ये 5 कोटी रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणूकीपासून सुरू झालेला एलआयसीचा ऍसेट बेस 31,96,214.81 कोटी रुपयांचा आहे.