सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझेसोबत 5 अधिकारी निलंबित झाले. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर तुरुंगात जाण्याची वेळ आली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग घरी गेले. अनिल परब, अनिल देशमुख यांच्यानंतर जितेंद्र आव्हाड हे आता लाईनीत आहेत. त्यामुळे आगे आगे देखो होता है क्या, असे म्हणत भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. हे सरकार 5 वर्ष टिकावे मात्र जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या सरकारचे अर्धा डझन मंत्री आणि अर्धा डझन नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम भाजपकडून मी करणार असल्याचेही किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यावेळी म्हणाले.
किरीट सोमय्या हे कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (दि. 29) सोलापूर दौ-यावर होते. सोमय्या यांनी सकाळी शासकीय रूग्णालय आणि मार्कडेय रूग्णालयास भेट देत तेथील रुग्णांशी संवाद साधला. तसेच त्यांनी प्रशासनाकडून कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले की, शिवसेना नेते प्रताप सरनाईक हे फरार आहेत. संजय राऊतांना तोडीचे 55 लाख रुपये परत द्यावे लागलेत. मुंबईच्या महापौरांनी एसआरएचे गाळे ढापले आहेत हे हायकोर्टात सिद्ध झाल्याचे सोमय्या म्हणाले. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेता शिवानंद पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख व अन्य भाजप नेते, नगरसेवक, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.