बहुजननामा ऑनलाईन – क्रिकेट सल्लागार प्रशिक्षकाची निवड माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली करणार आहे. यासंदर्भात आता आलेली मोठी बातमी म्हणजे आता भारतीय संघाला विदेशी प्रशिक्षक मिळणार नाही. यामुळे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची फेरनिवड निश्चित मानली जात आहे. प्रशिक्षकांची नेमणूक करण्यासाठी सीओएने माजी कर्णधार कपिल देव, शांता रंगास्वामी आणि अशुंमन गायकवाड या तीन सदस्यांची नेमणूक केली आहे.
सीएसीच्या मते शास्त्री यांच्या देखरेखीखाली टीम चांगलीच कामगिरी करत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा शास्त्री विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम करणार आहेत हे आता जवळपास निश्चित झाले आहे. सीएसी सदस्यांच्या मते, गॅरी कस्टर्न सारख्या एखाद्या व्यक्तीने या पदासाठी अर्ज केला असता तर आम्ही त्यावर नक्की विचार केला असता, परंतु भारतीय प्रशिक्षकाला नेहमीच आमचे प्राधान्य राहील. आम्ही परदेशी प्रशिक्षक नेमण्याच्या बाजूने नाही.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका अधिकाऱ्याकडून असे सांगण्यात आले की, सद्य परिस्थितीत बदल करून नव्या व्यक्तीला संधी दिल्यास भारतीय संघाच्या रणनीतीमध्ये बदल होईल आणि याचा परिणाम ५ वर्षांसाठी असेल. त्यामुळे सर्वांची इच्छा नसताना जर बदल झाले तर त्याचा भारतीय संघावर अन्याय करणारे ठरेल. भारतीय संघाच्या प्रशिक्षपदाच्या निवडीसंदर्भात क्रिकेट सल्लागार समितीने घेतलेला निर्णय हा अंतिम निर्णय असेल आणि बीसीसीआयला शिफारस करण्याची आवश्यकता भासणार नाही, असे क्रिकेट प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय यांनी स्पष्ट केले.