मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार कंगना रणौत (Kangana Ranaut) हिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कंगनाला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) राजद्रोहाच्या आरोपावरून समन्स बजावलं होतं. यानुसार कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांना वांद्रे पोलीस ठाण्यात हजर राहायचं होतं. परंतु भावाच्या लग्नाच्या गडबडीत व्यस्त आहे असं सांगत तिनं मुंबईला येणं टाळलं. यानंतर पोलिसांनी त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावलं होतं. त्यांना 10 नोव्हेंबर रोजी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु पुन्हा एकदा भावाच्या लग्नाचं कारण देत तिनं पोलीस ठाण्यात हजर राहण्याचं टाळलं आहे.
कंगनाच्या भावाचं लग्न 10 नोव्हेंबर रोजीच आहे. रणौत बहिणींचं म्हणणं आहे की, भावाचं लग्न झाल्यानंतरच आम्हाला मुंबईला येणं शक्य होणार आहे. कंगनाला राजद्रोहाच्या आरोपावरून समन्स बजावण्यात आलं आहे. तिनं महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस आणि मुंबईबद्दल चुकीच्या शब्दांत मत प्रदर्शित केलं होतं.
कंगना आणि तिची बहीण रंगोली यांना वांद्रे पोलिसांनी 21 ऑक्टोबरच्या आधी पहिली नोटीस पाठवली होती. परंतु तिच्या वकिलांनी सांगितलं की, कंगना आणि रंगोली सध्या भावाच्या लग्नात व्यस्त आहेत. सध्या त्या दोघी हिमाचल प्रदेशात आहेत. त्यामुळं त्यांना मुंबईला येणं शक्य होणार नाही.
आता मुंबई पोलीस कंगनाच्या या भूमिकेवर नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कंगनाच्या अडचणीत येत्या काही दिवसांत आणखी वाढ होण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवीमध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.