मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी जाहीर सभेत असा आरोप केला की, “आमच्या काकांनी ५० कोटी रुपये देऊन मंत्रिपद घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा बीडमध्ये आली असताना, जाहीर सभेत संदीप क्षीरसागर बोलत असतांना म्हणाले की, “एवढे पैसे बीडच्या विकासासाठी लावले असते तर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला असता,” यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करुन जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना मंत्रिपदही मिळालं. मात्र या काका-पुतण्यामधील वाद शिगेला पोहोचल्याचं दिसतं.
‘ही ‘वानरसेना’च तुमच्यासारख्या गर्विष्ठ रावणाची लंका जाळणार’
संदीप क्षीरसागर जयदत्त क्षीरसागर यांच्या शिवसेना प्रवेशावर बोलताना म्हणाले की, “अण्णा तुम्ही काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांना सांगत होता की आता हातातून घड्याळ काढा आणि धनुष्य हाती धरा. मात्र आता तुमचे वय ७५ झाले आहे. या वयात धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला तर बरगड्या फुटतील. याबरोबरच तुम्ही आम्हाला ‘वानरसेना’ म्हणून हिणवता, पण तुमच्यासारख्या गर्विष्ठ रावणाची लंका हीच ‘वानरसेना’ जाळल्याशिवाय राहणार नाही,” असं संदीप क्षीरसागर यांनी आगामी काळातील संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत दिले.
“सत्तेचा वापर प्रॉपर्टीसाठी केला म्हणूनच राज्यात आणि देशात एवढेच नव्हे तर परदेशात सुद्धा दोघा भावांनी म्हणजे जयदत्त आणि भारतभूषण क्षीरसागर यांनी प्रॉपर्टी घेतली,” असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी जाहीर सभेतून केला. एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बीड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीप क्षीरसागर तर शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर हे काका-पुतणे एकमेकांविरोधात निवडणूक लढणार आहेत. मात्र निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपांनी सुरुवात झाल्याने बीड विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार हे मात्र नक्की.