जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – शेतकरी हिताचा विचार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शेती व शेतकऱ्यांविषयी असलेली तळमळ ही सर्वांनाच परिचित आहे. १९८० साली त्यांनी जळगाव ते नागपूर अशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पायी दिंडी काढली होती. या दिंडीला आज ३९ वर्ष पूर्ण झाली. दिल्ली येथील सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला त्यांनी पांठिबा दर्शविला आहे. या संदर्भात ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शिष्टमंडळासह भेटणार आहेत .
विरोधकांना आंदोलनात एकत्र आणले
दिग्गज नेत ग. प्र. प्रधान, बाब आढाव, शिवाजीराव देशमुख, एन. डी. पाटील,गणपतराव देशमुख, एस. एम. जोशी, राजारामबापू पाटील, प्रतिमा दंडवते, नानासाहेब गोरे, बापूसाहेब काळदाते, जॉर्ज फर्नांडीस, मृणाल गोरे, गोविंदराव आदिक, ए. बी. वर्धन, अरुण मेहता, शिवाजीराव गिरधर पाटील, सुरेश कलवाडी हे नेते सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी शरद पवारांनी या दिग्गज नेत्यांना जे विरोधक होते त्यांना आंदोलनात एकत्र आणले होते.
पवनेपाचशे किलोमीटर पायी प्रवास
या आंदोलनामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला होता. त्यानंतर या आंदोलनाची प्रेरणा घेत दिल्ली येथे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं होतं . शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत जळगाव शहरातून निघालेली पायी दिंडी नागपुरला पावणेपाचशे किलोमीटरचा पायी प्रवास करून पोहचली. त्यावेळीचे अंतुले सरकारने दिंडीत सहभागी होण्यासाठी गेलेले यशवंतराव चव्हाण यांना अटक केली होती.
आंदोलनाला सिनेकलाकरांचा पाठिंबा
यात दिलीपकुमार, जब्बार पटेल, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू ही मंडळी दिंडीत सहभाग घेण्यास नागपुरला निघाले असता शरद पवारांनी त्यांना न येण्याचा निरोप दिला होता. शरद पवारांनी केलेल्या शेतकरी आंदोलनाला या सिनेकलाकरांनी पाठिंबा दिला होता.
दरम्यान, ९ डिसेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शिष्टमंडळासह शरद पवार भेटणार आहे. सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दिल्ली येथे पंजाब व हरियाणाच्या शेतकऱयांनी आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला शरद पवारांनी पांठिबा दिला आहे.