बहुजननामा ऑनलाइन टीम : जम्मू-काश्मीरमधील पुलवामात १४ फेब्रुवारीला झालेला दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट ‘आयएसआय’ या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयएसआयने काही निवडक दहशतवाद्यांना एकत्र करुन एक दहशतवादी गट तयार केला आहे. या दहशतवादीच गटाचे नेतृत्व जैश-ए-मोहम्मद या संघटनेकडे देण्यात आले आहे. या गटाला ‘गजनवी फोर्स’ असे नाव देण्यात आले आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जैश, लष्कर आणि अंसार गजवत-उल-हिंद या संघटनांनी मिळून सुरु केलेला हा नवा दहशतवादी गट काश्मिर भारतीय सुरक्षारक्षकांवर ‘आयईडी’ स्फोटकांनी हल्ला करण्याची शक्यता आहे. या माहितीनंतर भारतीय लष्कराकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, भारतातील जम्मू आणि काश्मीर च्या पुलवामा जिल्ह्यातील जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील, लेथापोरा या अवंतीपोराजवळ असलेल्या ठिकाणी केंद्रीय रिझर्व्ह पोलिस फोर्सच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या सुरक्षा दलांच्या वाहनांच्या एका ताफ्यावर, दुपारी सुमारे ३.१५ वाजता एका आत्मघाती हल्लेखोराने आपल्या वाहनासकट हल्ला केला होता. या वाहनात स्फोटके भरलेली होती.
ताफ्यातील केंद्रीय राखीव बलातील सुमारे ४० जवानांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याच प्रकरणाच्या चौकशीनंतर भारताने पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मुदस्सिर अहमद खान याच्यासह त्याच्या 4 साथीदार दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले गेले आहे. याच देशात दहशतवादी कारवाया केल्याचा आरोप या चौघांवर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केला आहे.