नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील काल झालेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने भारताला पराभूत करत सेमीफायनलमधील आपल्या प्रवेशाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. सलग पाच सामन्यांत विजय मिळवल्यानंतर अखेर इंग्लंडने भारताच्या विजयरथाला ब्रेक लावला. त्यामुळे कालच्या सामन्यात विजय मिळवून सेमीफायनलमधील आपला प्रवेश निश्चित करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न होता, मात्र कालच्या पराभवाने तो लांबला आहे. त्यामुळे आता भारताला उद्या होणाऱ्या बांग्लादेशच्या सामन्यात विजय मिळवून ते स्थान पक्के करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहली याने भारतीय संघाच्या पराभवाची कारणे सांगितली. तसेच कोणत्या क्षणी भारतीय संघ खचला याचे देखील त्याने स्पष्टीकरण दिले.
या चार कारणांमुळे झाला भारतीय संघाचा पराभव
१)कुलदीप आणि चहल फ्लॉप
कालच्या सामन्यात वेगवान गोलंदाज उत्तम कामगिरी करत असतं भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजांना मात्र चांगली कामगिरी करता आली नाही. युझवेन्द्र चहलला या सामन्यात १० षटकांत ८८ धावा देऊन देखील एकही बळी मिळवता आला नाही. त्याचबरोबर कुलदीप यादव याने १० षटकांत ७२ धावा देताना एक बळी मिळवला. इंग्लंडच्या सलामीवीरांनी या दोन गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. चहलच्या १० षटकांत ७ चौकार आणि ६ षटकार ठोकले गेले. त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब गोलंदाजीचे प्रदर्शन होते.
२)डीआरएस बाबतीत चुकीचा निर्णय
भारतीय संघाला या सामन्यात योग्य वेळी डीआरएसचा वापर न केल्याचा देखील मोठा फटका बसला. हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर ११ व्या षटकात सलामीवीर जेसन रॉय याच्या ग्लोव्हसला चेंडू घासून गेला होता. मात्र अम्पायरने तो वाईड दिल्याने कर्णधार कोहली याने धोनीशी याबाबतीत चर्चा केली. मात्र धोनीने डीआरएस घेण्यास मनाई केल्यामुळे भारताला मोठा फटका बसला. त्यानंतर जेसन रॉय याने शानदार अर्धशतकी खेळी केली.
३) जखमी राहूल सलामीला
सामन्यादरम्यान के.एल राहुल जखमी झाल्याने त्याला फिल्डिंगसाठी मैदानात उतरता आले नाही. त्यामुळे ३३८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने जखमी के. एल. राहुलला सलामीला पाठवले त्यामुळे त्याला नीट खेळता येत नव्हते. त्यामुळे फलंदाजी करताना ९ चेंडूंचा सामना करून देखील त्याला खाते उघडता आले नाही. अखेर ख्रिस वोक्स याच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्यामुळे जखमी खेळाडूला सलामीला पाठवून भारतीय संघ व्यवस्थपणाने मोठी चूक केली.
४) भारतीय डावात एकमात्र षटकार
एकापेक्षा एक आक्रमक फलंदाज संघात असताना भारतीय संघाला ३३८ धावांचा पाठलाग करताना केवळ एक षटकार मारता आला. हार्दिक पंड्या, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी रोहित शर्मा यांसारखे आक्रमक खेळाडू असून देखील भारतीय संघाला एकच षटकार मारता आला. त्याचवेळी इंग्लंडने आपल्या संपूर्ण डावात तब्बल १३ षटकार लगावले. या सर्व कारणांचा विचार करता सर्वच स्तरावर काल भारतीय संघ कमी पडल्याचे दिसून आले आहे.