नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल बीएस धनोआ यांनी बालाकोट एअरस्ट्राईक बाबत मोठा खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना धनोआ यांनी सांगितलं आहे की, बालाकोट एअर स्ट्राईक कारवाई रात्रीच्या वेळेसच का केली होती. चांगलं तंत्रज्ञान असणारे देश रात्रीच हल्ला करतात. तुम्ही गल्फ वॉर पहा, त्याची सुरुवातही रात्रीच झाली होती. जेव्हा तु्म्ही रात्री हल्ला करता तेव्हा याचा अर्थ असा होतो की, तुमच्याकडे चांगलं तंत्रज्ञान आहे.
पाकिस्तानने आरोप केला होता की, भारत रात्री हल्ला करून पळून गेला. याच आरोपाला उत्तर देताना एअर चीफ मार्शल बीएस धनोआ यांनी हे उत्तर दिले होते. या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या वायुसेनेने प्रत्युत्तर देत कारवाई केली होती आणि बालाकोट मधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्बचा पाऊस पाडला होता. धनोआ म्हणाले हे पाकिस्तानचं विधान होतं. आम्ही त्यांना आव्हान दिलं होतं. ते आम्हाला आव्हान नाही देऊ शकले. आम्ही आमच्या ध्येयात यशस्वी झालो. हीच खूप मोठी गोष्ट आहे.
धनोआ म्हणाले की, “ऑपरेशनबद्दल मी इथे माहिती नाही सांगू शकत. कोणती हत्यारं वापरण्यात आली हे सर्व मी इथे नाही सांगू शकत.” पाकच्या अनेक मंत्र्यांनी आण्विक हल्ल्याची धमकी दिली आहे, यावर बोलताना धनोआ म्हणाले, “आम्ही कोणत्याही युद्धासाठी तयार आहोत. शेवटी निर्णय सरकारला घ्यायचा आहे. आम्हाला आमच्या क्षमता चांगल्या प्रकारे माहिती आहेत.”
काय आहे पूर्ण घटनाक्रम ?
14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामाच्या सीआरपीएफच्या ताफ्यावर जैशच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात 40 हून अधिक जवान शहिद झाले होते. या हल्ल्याच्या 13 दिवसांनंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून दहशतवाद्यांचे कॅम्प उध्वस्त केले होते. या हल्ल्यानंतर चवताळलेल्या पाकने दुसऱ्या दिवशीच भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग 21 ने पाकच्या एफ 16 या लढाऊ विमानाला नियंत्रण रेषेजवळ पाडलं.
Visit : bahujannama.com