बहुजननामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून कधी ऊन तर कधी पाऊस या वातावरणामुळे नागपूर जिल्ह्यात साथीचे आजार परसत आहेत. टायफॉईड, मलेरिया, स्वाईन फ्ल्यू,, डेंग्यूसारख्या आजाराने संपुर्ण जिल्ह्यात थैमान घातले आहे. मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,जानेवारी २०१९ पासून सप्टेंबरपर्यंत १२५ हून अधिक जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यातील फक्त नागपूर शहरातील रुग्णांची संख्याच शंभरहून अधिक आहे. तर ग्रामीण भागात २५ हून अधिक डेंग्यूच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात ४९, सप्टेंबर महिन्यात १८ दिवसांत ४२ डेंग्युग्रस्त रुग्ण असल्याचे आढळून आले. जानेवारी ते सप्टेंबर पर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, जानेवारीमध्ये २५ जण आणि त्यानंतर थेट ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये डेंग्यूग्रस्तांची संख्या वाढली असल्याचे आढळून आले.
शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही डेंग्यूची लागण होण्याचे प्रमाण वाढलेले लक्षात आल्यावर त्वरीत रोगप्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांनी सांगितले. मात्र शहरात डेंग्यूचा उद्रेक कायम असूनही याकडे महापालिकेचा आरोग्य विभाग गंभीर नाही. त्यातच स्वाइन फ्लूचे २६६ रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला असून हे आठ जण शहरातील असल्याची माहिती आहे. याशिवाय स्क्रब टायफसचेही पाच रुग्ण आढळले असल्याचे निदानातून स्पष्ट झाले.
Visit : bahujannama.com