नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत चालला आहे. देशात कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. या रुग्णसंख्येने रेकॉर्ड मोडला आहे. शनिवारी देशात कोरोनाचे तब्बल 62 हजार 714 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 312 जणांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी आढळून आलेल्या रुग्णसंख्येमुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने एक कोटीचा टप्पा पार केला आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 19 लाख 71 हजार 624 वर पोहचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 61 हजार 552 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शनिवारी 28 हजार 739 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 1 कोटी 13 लाख 23 हजार 762 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात 6 कोटी 2 लाख 69 हजार 782 लोकांना लस देण्यात आली आहे.
India reports 62,714 new #COVID19 cases, 28,739 discharges, and 312 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry.
Total cases: 1,19,71,624
Total recoveries: 1,13,23762
Active cases: 4,86,310
Death toll: 1,61,552Total vaccination: 6,02,69,782 pic.twitter.com/RWD288fXEz
— ANI (@ANI) March 28, 2021
दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितनुसार, महाराष्ट्रातील 36 पैकी 25 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. देशात मागील एका आठवड्यात आढळून आलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी 59.8 टक्के रुग्ण या 25 जिल्ह्यातील आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली 12 राज्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रधान सचिव तसेच सर्वाधिक कोरोना रुग्ण आणि मृत्यू नोंदवले गेलेल्या 46 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांची उच्चस्तरीय बैठक घेतली. यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. यानुसार जवळपास 90 टक्के मृत्यू हे 45 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या लोकांचे झाले असल्याचे समोर आले. तर केवळ 44 टक्के लोकच मास्कचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे.