दिल्ली वृत्तसंस्था – यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप प्रणित NDA सरकार भरगोस मतांनी निवडून आले यावर ६४ माजी सनदी अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात पत्र लिहिलं आहे. यंदाच्या लोकसभेत अनेक बेकायदेशीर प्रकार घडले असून ही निवडणूक ३० वर्षांतील सर्वाधिक पक्षपाती निवडणूक असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आल्या आहेत. या पत्राला ८३ दिग्गजांनी पाठिंबा दिला असून त्यामध्ये लष्करी अधिकारी, विचारवंत आणि कलाकारांचा समावेश आहे.यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
२०१९ च्या निवडणुकीमध्ये अनेक बेकायदेशीर घोळ करण्यात आले असून या घोळांना निवडणूक आयोगाची मुक संमती होती असा आरोपच या अधिकाऱ्यांनी केला आहे. पंतप्रधान मोदींना ८ फेब्रुवारी-९ मार्चमध्ये अनेक विकासकामांचे उद्घाटन करायचं होतं म्हणूनच तारखा जाहीर करण्यास निवडणूक आयोगाने विलंब केला असा आरोप अधिकाऱ्यांनी घेतला आहे. मतदानाच्या तारखा १० मार्चला जाहीर करण्यात आल्या होत्या. तसेच ज्या राज्यांमध्ये भाजप कमकुवत आहे त्या राज्यांमध्ये एकाच टप्प्यात सर्व जागांवर मतदान झालं उदा. तेलंगण, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू. तर दुसरीकडे ज्या राज्यांमध्ये भाजपला विरोधी पक्ष टक्कर देत आहेत अशा राज्यांमध्ये दोन-तीन टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यात आल्या. विशेष म्हणजे या राज्यांमध्ये जागाही कमी होत्या. उदा. मध्य प्रदेश (२९), राजस्थान (२५), ओडिशा (२१).
याशिवाय निवडणुकांदरम्यान होणारे गैरप्रकार, निवडणूक प्रक्रियेतील बदल या विषयावर आज राज्यसभेत चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे. तेव्हा या पत्राच्या आधारे विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार असल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे.
काय केले आरोप ?
निवडणुकीमध्ये अनेक बेकायदेशीर घोळ करण्यात आले मात्र आयोग गप्प
मोदींना विकासकामांचे उदघाटन करायचे होते म्हणून तारखा जाहीर करण्यास विलंब
भाजप कमकुवत असणाऱ्या राज्यात एकाच टप्प्यात सर्व जागांवर मतदान घेतले
नीती आयोगाचा गैरवापर करण्यात आला
आचार संहितेच्या उल्लंघनाबाबत निवडणूक आयोगाची पक्षपाती भूमिका
बालाकोट एअरस्ट्राइक मुद्यांच्या आधारे प्रचार केला
पैशांची अफरातफर,नमो टीव्ही, माध्यमांचा गैरवापर
ईव्हीएम ,मतदार यादीत झालेले घोटाळे