नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सौरव गांगुली आता देशाच्या राजकारणात भातीय जनता पार्टीकडून उतरणार आहेत असे संकेत मिळाले आहेत. यानंतर आता अनेक अंदाज लावले जाताना दिसत आहेत. सौरव गांगुली हे महान कर्णधार आणि खेळाडू होते. ते बीसीसीआयचे अध्यक्ष होते. एक प्रशासक म्हणून चांगलं काम केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे त्यांनी अध्यक्षपद भूषवावे अशी मागणी झाली होती. परंतु गांगुलींनी असं केलं नाही कारण त्यांना देशाच्या राजकारणात उतरायचं होतं असं समजत आहे. बंगालमध्ये गांगुलींचा चांगला नावलौकिक आहे. अजूनही गांगुलींसाठी चाहते वेडे आहेत. याच गोष्टीचा फायदा आता भाजप घेणार असल्याची माहिती आहे.
गांगुलींच्या मागे भाजपच का ?
बंगालमध्ये सध्या भाजपचा पक्का वैरी समजल्या जाणाऱ्या पक्षाचं म्हणजेच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचं सरकार आहे. परंतु बंगालमध्ये भाजपकडे तोडीचा चेहरा नाही. पुढच्या वर्षी बंगालमध्ये निवडणुका होणार असल्याचं बोललं जात आहे. यासाठी भाजपला मुख्यमंत्रीपदासाठी चांगला चेहरा हवा आहे. म्हणून भाजपनं गांगुली यांची निवड केली आहे असं बोललं जात आहे.
गांगुलींकडून कसे मिळाले याचे संकेत ?
भाजप आणि टीएमसी यांच्यातील राजकीय वैर सर्वांनाच माहित आहे. टीएमसीच्या ममता बॅनर्जी यांनी सौरव गांगुली यांना काही वर्षांपूर्वी एक जमीन दिली होती. या जमिनीवर गांगुलींना शाळा आणि कॉलेज उभं करायचं होतं. परंतु अद्याप या जमिनीवर काहीही काम झालेलं नाही. जर काहीही काम केलं असतं तर भाजपमध्ये गेल्यानंतर ते अंगलट येऊ शकतं. त्यामुळं गांगुली यांनी ही जमीन बंगाल सरकारला परत केली आहे. यावरूनच गांगुलींचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे अंदाज लावले जात आहेत. अनेक खेळाडू असे आहेत ज्यांनी आजवर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आता भाजपचा खासदार आहे.