इंदापूर : बहुजननामा ऑनलाईन – इंदापूर तालुक्यातील ऑगस्ट 2020 अखेर मुदत संपलेल्या 60 ग्रामपंचायती व उर्वरित 55 ग्रामपंचायतींची अशी तालुक्यातील एकूण 115 ग्रामपंचायतींची सन 2020-25 कालावधीसाठी सरपंच पदांसाठीच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास बुधवारी (दि. 8 डिसेंबर 2020) इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवनमध्ये तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या उपस्थितीत निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा सुरुवात करण्यात आली. आरक्षण सोडतीसाठी प्रशासकीय यंत्रणेकडून दिलेल्या वेळेत पूर्ण तयारी करून सोडतीसाठी तहसीलदार यांच्यासह सर्व यंत्रणा सज्ज असताना तालुक्यातील नागरिक व राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी आरक्षण सोडतीकडे पाठ फिरवल्याने आरण सोडत उशिरा सुरू करण्याची पाळी प्रशासकीय यंत्रणेवर आल्याने आगामी गावकारभारी निवडणुकीविषयी नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे दिसून आले.
सरपंच आरक्षण सोडतीसाठी इंदापूर तालुक्यातील मतदार, राजकीय पक्षांचे इच्छुक व पदाधिकारी यांच्यासह सर्वांनीच आरक्षण सोडतीकडे काणाडोळा केल्याने आरक्षण सोडत निर्धारित वेळेपेक्षा उशिरा सुरू झाली. त्यावेळी शासकीय यंत्रणा फौजफाटा सोडला तर जेमतेम 20 च्या आसपास नागरिक सोडतीसाठी उपस्थित होते. तालुक्यातील 115 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांची आरक्षण सोडत असताना मोजकेच इच्छुक नागरिक उपस्थित असल्याने सोडतीच्या ठिकाणी नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती. उपस्थितांपैकी अनेकांनी आजची सोडत रद्द करून पुढील तारीख निश्चित करण्याची इच्छा पोलीसनामा प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
इंदापूर तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडतीच्या दिवशी देशातील शेतकर्यांनी संपूर्ण देश बंदची केलेली घोषणा, तालुक्यात वारंवार डोके वर काढत असलेला कोरोना, अतिवृष्टीने भरडला गेलेला तालुक्यातील बळीराजा हा अगोदरच पुरता खचून गेला आहे, तर नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे मतदारांना नानाविध समस्यांना तोंड द्यावे लागले. आगामी काळात एक वर्षाच्या आत तालुक्यात होणार्या ग्रामपंचायती, पंचायत समिती-जिल्हा परिषद, पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँक, कर्मयोगी व छत्रपती सह.साखर कारखाना, नगर परिषद आदी निवडणुकांना सामोरे जावे लागणार असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर असल्याने याचाच परिणाम आजच्या सरपंच आरक्षण सोडतीवर झाल्याचे दिसून आल्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे. आगामी निवडणुकीविषयी गावकारभारी व राजकीय नेते गुडघ्याला बाशिंग बांधून राजकीय आखाडा लढविण्यास तयार असले तरी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक व शेतकरी आसमानी संकटाने पुरता खचल्याने मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे दिसून येत आहे.