मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदल, पदुषणातील वाढ यामुळे राज्यातील पाच वर्षांखालील बालकांमध्ये श्वसनाच्या आजारांत वाढ झाली असून हे प्रमाण ग्रामीण भागात सर्वाधिक असल्याचे सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. बालकांमधील श्वसनाचे आजार 2.4 टक्क्यांवरून 3.2 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. या बालकांना ताप किंवा अन्य लक्षणे असूनही केवळ 77 टक्के बालकांवरच उपचार केल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणाच्या अहवालातून समोर आलेली आकडेवारी दर्शवते की, केवळ 84 टक्के बालकांवर निदान करण्यात आले आहे. अतिसार झालेल्या बालकांचे प्रमाण 8.5 टक्क्यांवरून 8.9 टक्के वाढले आहे. या बालकांना उपचारांसाठी नेण्याच्या प्रमाणातही घट झाली आहे. यातील 72 टक्के बालकांना उपचारांसाठी नेण्यात आले होते. तर एनएफएचएस-4 मध्ये हे प्रमाण 77 टक्के होते. ग्रामीण भागातील बालकांमध्ये अतिसाराचे प्रमाण जास्त (10.7 टक्के) आहे.
सर्वाधिक स्थुल बालके शहरात
सव्हेक्षणानुसार, बालकांमध्ये अतिस्थूलतेचे प्रमाणही वाढत चालले आहे. चार वर्षापूर्वी हे प्रमाण केवळ 1.9 टक्के होते. यंदाच्या अहवालात हे चार टक्क्यांवर येऊन पोहोचले आहे. सर्वाधिक स्थूल बालके शहरात 5.2 टक्के आढळली असून त्याखालोखाल 3.4 टक्के ग्रामीण भागात आढळल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे रक्तक्षय झालेल्या बालकांचे प्रमाण 53.8 टक्क्यांवरून 68.9 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. ग्रामीणमधील बालकांमध्ये हे प्रमाण 70 टक्के आहे, तर शहरी भागात 66.3 टक्के नोंदले आहे. याबाबत चस्ट फिजिशियन डॉ. अशोक ठाकूर म्हणाले की, कोरोना महामारी, हवामानातील तीव्र बदल, हवेचा खालावलेला दर्जा आणि वाढते प्रदुषण यामुळे श्वसनाच्या विकारात वाढ झालेली दिसत आहे. याविषयी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.
बालमृत्यूच्या प्रमाणातही किंचित झाली घट
बालकांच्या ( 1 ते 5 वर्षाखालील) मृत्यूच्या प्रमाणात अनुक्रमे 0.5 व 0.7 टक्क्यांनी किंचित घट नोंदवली असली तरी नवजात बालकांचा मृत्युदर मात्र 16.2 वरून 16.5 इतका वाढला आहे. अहवालानुसार, आरोग्य विम्याचे संरक्षण असणाऱ्यांचे प्रमाण 15 वरून 20 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.ग्रामीण भागात 13.8 टक्के लाभार्थ्यांचे प्रमाण 19.9 टक्क्यांपर्यंत तर शहरातही 16 वरून 20 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.