कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीकडून ४ जणांवर पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ८ आरोपींची चौकशी एसआयटीने केली आहे. अमित देगवेकर, अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, आणि भारत कुरणे या चौघांविरोधात ४०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कट रचणे, गुन्हा करण्यास प्रवृत्त, खून करने या कलमाखाली हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. भक्कम पुराव्यांसह ८५ साक्षीदारांचा अंतर्भाव यामध्ये करण्यात आला आहे.
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी डॉ. विरेंद्र तावडे, गायकवाडच्या चौकशीतून सारंग अकोळकर, विनय पवार यांच्यासह अन्य चार संशयिताची नावे निष्पन्न झाली होती. त्यानुसार एसआयटीने अमोल काळे ,वासुदेव सुर्यवंशी ,भरत कुरणे आणि अमित देगवेकरला अटक केली होती.
कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येसाठी मास्टरमाईंड डॉ. वीरेंद्र तावडे यांनी अमोल काळेसह चारही मारेकऱ्यांवर वेगवेगळी कामगिरी सोपवली होती. बाँबस्फोट घडविण्यासह बंदूक चालविण्याच्या प्रशिक्षणाचीही जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. तर देगवेकरवर कॉम्रडे पानसरे यांचे निवासस्थान, बिंदूचौकातील कार्यालयाच्या रेकीची जबाबदारी सोपविण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिली आहे. या चौघांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दोषारोपपत्र दाखल झालेल्या आरोपींची संख्या आता ८ वर गेली आहे.