सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र शासनाच्यावतीने पोलीस भरती बदला विरोधात काढण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सोलापुरात निषेध आंदोलन करण्यात आले. शासनाच्यावतीने काढण्यात आलेला जीआर हा तरुणांवर अन्याय करणारा असून पोलीस दल सक्षम होण्याऐवजी दुबळे होण्याची भीती व्यक्त करत हे आंदोलन करण्यात आले.
पोलीस भरतीच्या संदर्भात राज्य शासनाने १८ जानेवारी २०१९ रोजी शासन निर्णय घेऊन पोलीस भरतीचे निकष बदलले आहेत. नवीन नियमात बदल करत असताना अगोदर लेखी परीक्षा आणि नंतर मैदानी चाचणी. असा निर्णय घेऊन मैदानी चाचणी देखील १०० मार्क वरून ५० मार्कची करण्यात आलेली आहे.
ग्रामीण भागातील तरुण मागच्या पाच वर्षापासून पोलीस भरतीची तयारी जुन्या भरती प्रक्रियेनुसार करत आहेत. जुन्या प्रक्रियेनुसार सुरुवातीला मैदानी चाचणी घेतली जात होती. त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जायची, जुन्या भरती प्रक्रीयानुसासर महाराष्ट्रभरातील तरुणांनी तयारी केलेली असताना नवीन बदलानुसार भरती घेतल्यावर मोठ्या प्रमाणात तरुण या भरतीपासून वंचित राहतील आणि बेरोजगारी वाढेल, अशी भीती वंचित बहुजन आघाडीने व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या निर्णयाचा निषेध केला आहे.