बहुजननामा ऑनलाइन टीम –माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आरेतील वृक्षतोडीवरून सर्व स्तरातून निषेध नोंदविण्यात आला होता. रात्रीच्या वेळी केलेल्या वृक्षतोडीवरून तत्कालीन सरकारविरोधात निदर्शनेदेखील करण्यात आली होती. याच संदर्भात आरे जंगलाविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनाच्या आठवणी जाग्या करून आनंद व्यक्त केला आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशेजारी असणाऱी आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. या राखीव ठिकाणी वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत घेतला. त्याचा आनंद व्यक्त जितेंद्र आव्हाड यांनी अभिनंदनाचं ट्विट केलं.
मित्रहो…..
आम्ही दिलेला शब्द जपला….
आरे चे जंगल वाचावं ह्यासाठी माझ्या सहित अनेक जणांनी आंदोलने केली
तुरुंगात गेले पण तत्कालीन सरकार बधले नाही
परंतु आपले सरकार आल्याबरोबर हे वन संरक्षित करण्याचा निर्णय घेतला गेला
अभिनंदन आपणा सर्वांचे#संघर्षाचा विजय असो pic.twitter.com/rZMD1NjqrK— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 3, 2020
“मित्रहो….. आम्ही दिलेला शब्द जपला… आरेचे जंगल वाचावं यासाठी माझ्या सहित अनेक जणांनी आंदोलने केली. तुरुंगात गेले पण तत्कालीन सरकार बधले नाही. परंतु आपले सरकार आल्याबरोबर हे वन संरक्षित करण्याचा निर्णय घेतला गेला. अभिनंदन आपणा सर्वांचे. संघर्षाचा विजय असो,” असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
आरेच्या आंदोलनावेळी आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याची माहिती आव्हाड यांनी ट्विट करून दिली होती. अटकेबद्दलचं ते ट्विटही आव्हाड यांनी पोस्ट केले आहे. आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेवण्याच्या जागेसंदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रस्तावना केली. तर दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी या प्रस्तावासंदर्भात पुढाकार घेतला होता.