मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील महाविकासआघाडीच्या सरकार मधील नेत्यांमध्ये मतभेद निर्माण होतं आहे. सरकार पाच वर्ष टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वक्तव्य केलं की, राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार जर पाच वर्षे टिकावयचं असेल तर सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांशी समन्वय ठेवा, सरकार आणि पक्षात मतभेद निर्माण होतील, अशी वक्तव्य टाळा असं देखील पवारांनी सांगितलं आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठकीत त्यांनी सर्व मंत्र्यांना खात्यांतर्गत निर्णय घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी समन्वय ठेवा, वादग्रस्त मुद्दे टाळा, वादग्रस्त विधानं करू नका, अशा सूचना केल्या. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांसह खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुनील तटकरे यांची उपस्थित होते.
यावेळी पवारांनी मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेतला. तसेच, ज्या जिल्ह्यात पक्षाचा पालकमंत्री नाही त्या ठिकाणी संपर्कमंत्र्याची नेमणूक केली जाणार आहे. महामंडळावर नियुक्तीसाठी ज्या कार्यकर्त्यांची नावं जिल्हा कार्यकारणीकडून येईल, त्यांच्या नावांचा विचार होईल व त्यांना महामंडळावर संधी मिळेल, असे देखील सांगितले गेले. कोरेगाव- भीमा हिंसाचारप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) तपास सोपविण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याचे दिसत आहे. कारण, या प्रकरणी एसआयटीकडून तपास केला जावा, अशी पवारांकडून मागणी करण्यात आलेली होती. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) संदर्भात राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतली आहे. यास पक्षाचा विरोध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, याबाबत अजून निर्णय झाला नसून महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते याबाबत एकत्र येऊन निर्णय घेणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.