बहुजननामा ऑनलाइन टीम – दक्षिण भारतातील काही राजकारण्यांनी हिंदी भाषा न बोलणार्या नागरिकांशी पक्षपात केला जात असल्याचा आरोप केला आहे. या वादात आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दलाचे (सेक्युलर) नेते एच.डी. कुमारस्वामी यांनीदेखील उडी घेतली आहे. अजून किती कन्नड भाषिकांना हिंदी येत नसल्यामुळे त्रास सहन करावा लागणार आहे ?, असा सवाल त्यांनी केला.
आयुष विभागाद्वारे एका व्हर्च्युअल प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सचिव राजेश कोटेचा यांनी ज्यांना हिंदी येत नाही ते जाऊ शकतात असे सांगितले. मी इंग्रजीही चांगल्या प्रकारे बोलू शकत नाही. ही हिंदी किंवा इंग्रजी बोलण्याची सक्ती नाही का? अजून किती कन्नड भाषिकांना हिंदी बोलता येत नसल्यामुळे त्रास सहन करावा लागेल?, असा सवाल कुमारस्वामी यांनी केला आहे . दरम्यान, कोटेचा यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.
आयुष मंत्रालयाकडून कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. काही लोक या बैठकीत विनाकारण गोंधळ घालत होते. त्यांना नंतर म्यूट करण्यात आले. त्यानंतर याला भाषेच्या वादाचा रंग देण्यात आला, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या आरोपानंतर डीएमकेकडून कारवाईची मागणी करण्यात आली. डीएमकेचे खासदार कनिमोझी यांनी याप्रकरणी आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.